मुंबई

Sanjay Raut : ‘महाराष्ट्राचे तुकडे पाडू देणार नाही!’ – विदर्भ वेगळा करण्याच्या प्रयत्नांवर संजय राऊतांचा भाजपा-काँग्रेसला कडक इशारा

Sanjay Raut On Bjp And Congress : “मिंधे सरकारने महाराष्ट्र अदाणींच्या पायाशी ठेवला,” आक्रमक राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; वडेट्टीवारांच्या भूमिकेलाही समर्थन नाही.

मुंबई :- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी वेगळ्या विदर्भाच्या केलेल्या वक्तव्याला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी आज नागपुरातून दोन्ही पक्षांना खडे बोल सुनावले. “भाजपाने आणि काँग्रेसने कितीही आपटली तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही आणि वेगळा विदर्भ होणार नाही,” अशा शब्दांत संजय राऊतांनी ठणकावले आहे.

बावनकुळेंच्या वक्तव्यावरून राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “आज मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. बावनकुळे सांगतात की, विदर्भ वेगळा करण्यासाठी आमचं काम सुरू आहे. यावर मिंधे गटाचा एकही आमदार बोलला नाही, याचा अर्थ हे अमित शाहांचे मिंधे आहेत.”

यावेळी त्यांनी अदाणींच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्ला चढवला

“महाराष्ट्राच्या लढ्यात गौतम अदाणी नव्हते, पण सध्या महाराष्ट्र आणि मुंबई गौतम अदाणीच्या पायाशी ठेवण्याचा प्रयत्न मिंधे आणि फडणवीसांचं सरकार करत आहे.”लोकशाही मूल्यांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले.

“महाराष्ट्रासारख्या राज्याला दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही. याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. विरोधी पक्षनेत्याशिवाय कामकाज पुढे नेत आहात, याचा अर्थ तुम्ही विरोधी पक्षांना घाबरता,” असेही ते म्हणाले.

वडेट्टीवारांच्या भूमिकेवर बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले की, “आम्ही याबाबत वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या भूमिकेला समर्थन देत नाहीत. कोणी कितीही आदळआपट केली तरी विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होणार नाही.” ते म्हणाले की, आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भूमिकेसाठी एकत्र आहेत, त्यामुळे हे स्वप्न पाहणाऱ्यांचा स्वप्नभंग होईल.

vivek

Recent Posts