मुंबई

Sanjay Raut : दोन भाऊ, एकच व्यासपीठ! बाळासाहेबांच्या जयंतीला उद्धव आणि राज ठाकरे षण्मुखानंदमध्ये एकत्र येणार; संजय राऊतांची मोठी घोषणा

Sanjay Raut On Thackeray Brother : जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना आणि मनसेचा संयुक्त पुढाकार; महापालिका निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘ठाकरे बंधूं’च्या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते आणि सख्खे भाऊ असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे प्रदीर्घ काळानंतर एकाच सार्वजनिक व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभाचे औचित्य साधून येत्या 23 जानेवारी रोजी माटुंगा येथील ऐतिहासिक षण्मुखानंद सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (ठाकरे) आणि राज ठाकरे यांची मनसे हा कार्यक्रम एकत्रितपणे आयोजित करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात अधिकृत माहिती दिली असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत कळीची मानली जात आहे. मुंबईच्या सत्तेसाठी सुरू असलेल्या रस्सीखेचामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणे, हे केवळ भावनिकच नाही तर भविष्यातील नव्या राजकीय युतीचे संकेत देणारे ठरू शकते. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असून, खुद्द संजय राऊत यांनीच या संयुक्त कार्यक्रमाची घोषणा केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. “बाळासाहेबांचे विचार आणि त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत,” असा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केला जात आहे.

षण्मुखानंद सभागृहातील या सोहळ्यात दोन्ही नेते काय बोलतात आणि त्यांच्यातील देहबोली कशी असते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीलाच झालेली ही ‘ठाकरे भेट’ मुंबईसह राज्यातील आगामी सत्तेच्या गणितांना नवी दिशा देऊ शकते. या कार्यक्रमामुळे शिवसैनिक आणि मनसैनिक अनेक वर्षांनंतर एकत्र येऊन आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करतील. सत्तेच्या संघर्षात ‘हॉटेल पॉलिटिक्स’ आणि फोडाफोडीचे राजकारण सुरू असतानाच, 23 जानेवारीचा हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिणारा ठरू शकतो.

vivek

Recent Posts