मुंबई

Sanjay Raut : “15 हजार कोटी उडवून मिळालेला हा ‘पैशांचा’ विजय!”; संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघाती आरोप

•महायुतीने पैसे पाण्यासारखे वाहिले; सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवरही राऊतांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

मुंबई | राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. “हा विजय अभूतपूर्व आहे,” असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी, “हा विजय म्हणजे अभूतपूर्व पैसे वाटल्याची किमया आहे,” अशा शब्दांत हल्लाबोल केला. या निवडणुकीत महायुतीने 15 हजार कोटी रुपये खर्च केल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.

“पैसे पाण्यासारखे वाहिले”

संजय राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना कमालीचे आक्रमक दिसले. ते म्हणाले, “भाजपच्या विजयाची हॅट्रिक असेल किंवा मॅट्रिक, पण या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मिळून 15 हजार कोटी रुपये उडवले आहेत. मतदारांना पैसे दिले गेले, पैसा पाण्यासारखा वाहिला. ज्या विजयाला फडणवीस अभूतपूर्व म्हणत आहेत, तो प्रत्यक्षात सत्तेचा आणि संपत्तीचा गैरवापर आहे.”
एकनाथ शिंदेंवर वैयक्तिक टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना राऊत म्हणाले, “तुमची शिवसेना जर असली आहे, तर जाऊन अमित शहांचे पाय धुवून तीर्थ प्या. जी शिवसेना तुम्हाला अमित शहा यांनी बहाल केली आहे, तिचे ‘पुण्य’ तुम्हाला मिळत आहे.” मिंधे गटाने केवळ सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

सर्वोच्च न्यायालयावर ‘नाराजी’चा बाण

आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने 21 जानेवारीची तारीख दिल्याबद्दल राऊतांनी संताप व्यक्त केला. “सुप्रीम कोर्टावर दबाव आहे, म्हणूनच 40 आमदारांबाबत निर्णय दिला जात नाहीये. माणिकराव कोकाटे यांच्याबाबत 6 तासांत निर्णय होतो, पण संविधानाचे उल्लंघन करणाऱ्यांबाबत न्यायालय गप्प का? आता निवडणूक झाल्यानंतरच निर्णय द्या आणि हे इलेक्शनही तुम्हीच खा,” अशा तिखट शब्दांत त्यांनी न्यायालयाच्या सुनावणीवर नाराजी व्यक्त केली.

फडणवीसांचा ‘नंबर 1’ चा दावा

दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप हाच राज्यातील ‘नंबर 1’ चा पक्ष असल्याचे पुन्हा एकदा ठामपणे सांगितले. “महायुतीने 75 टक्के नगराध्यक्ष निवडून आणले असून महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया झाला आहे. नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात मतदारांनी भाजपच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे,” असे फडणवीस यांनी नागपूर जिल्हा भाजपच्या अभिनंदन प्रस्तावावेळी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0