
Sanjay Raut On BJP : “भाजप म्हणजे शेठजींचा पक्ष, मराठी अस्मितेचे आम्ही खरे वारसदार” — संजय राऊत
मुंबई | महाराष्ट्रात पुन्हा एकदा एकतेचा वादळ उठण्याची चिन्हं आहेत! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीच्या शक्यतेवर अखेर खुद्द उद्धव ठाकरेंनीच मोठा इशारा दिला आहे. “मी आता कुठलाही संकेत देणार नाही… थेट बातमी देईन,” असं सांगत त्यांनी राजकीय चर्चांना नवा उधाण दिलं. “महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे, तेच होणार,” असं ठाम विधान करत त्यांनी युतीच्या चर्चांना अधिक बळ दिलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर खुली आणि परखड प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील एकत्र येणं हे केवळ राजकीय नाही, तर मराठी अस्मितेच्या लढ्याचं प्रतीक ठरणार आहे. भाजप हा उपऱ्यांचा पक्ष आहे — त्यांचं महाराष्ट्राशी, मराठी माणसाशी काहीही देणंघेणं नाही. तो केवळ श्रीमंत शेठजींचा पक्ष आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
सामनात छापून आलेल्या उद्धव-राज यांच्या एकत्र फोटोवर बोलताना राऊत म्हणाले, “आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एकच भावना आहे — ही दोन टोके एकत्र यावीत. ज्या शक्ती महाराष्ट्राला संपवण्यासाठी दिल्ली आणि अहमदाबादहून खेळ खेळत आहेत, त्यांचा बंदोबस्त करायचा आहे.”
पुढे बोलताना राऊत म्हणाले, “इतिहासाची पाटी मागे वाचण्यात आम्हाला रस नाही. 2014, 2017 किंवा 1622 काय घडलं याचं महत्त्व नाही. आमचं लक्ष्य भविष्य आहे. आम्ही नरेंद्र मोदी-शाह यांच्या मेहरबानीने मुख्यमंत्री झालो नव्हतो, आम्ही संघर्षातून आलो आहोत!”


