
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | ‘मुंडवा जमीन घोटाळा’ अद्याप संपलेला नाही | राहुल गांधींच्या मोदींवरील टीकेचे समर्थन
मुंबई :- महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची (MVA) भूमिका काय असेल, याबाबत शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी आज मोठे संकेत दिले आहेत. “महाविकास आघाडीकडे एक जागा निवडून आणण्याइतपत बळ आहे आणि त्या जागेवर शरद पवार स्वतः निवडणूक लढवणार आहेत, याबद्दल माझ्या मनात शंका नाही,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.
मविआत शरद पवारांच्या नावावर एकमत?
संजय राऊत म्हणाले की, “काँग्रेसच्या रजनी पाटील, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि फौजिया खान, तसेच शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी असे तिन्ही पक्षांचे सदस्य निवृत्त होत आहेत. महाविकास आघाडीला एकच जागा मिळणार असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे) मिळून निर्णय घेतील. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता जर पुन्हा संधी घेण्याची इच्छा व्यक्त करत असेल, तर त्यावर चर्चा करून आम्ही निश्चितपणे पुढे जाऊ.”
पार्थ पवारांच्या उमेदवारीला विरोध आणि ‘मुंडवा’ जमीन प्रकरण
अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचालींवर राऊत यांनी कडाडून टीका केली. अंजली दमानिया यांनी केलेल्या विरोधाचा संदर्भ देत ते म्हणाले, “पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर होईल तेव्हा अनेक विषय समोर येतील. मुंडवा जमीन प्रकरणाचा विषय अद्याप संपलेला नाही. मुख्यमंत्री पाठीशी असल्याने असे विषय दडपले जात आहेत. जर हे विरोधी पक्षाच्या नेत्याचे चिरंजीव असते, तर चित्र वेगळे दिसले असते.”
अजित पवारांच्या मृत्यूचे ‘रहस्य’ आणि शोकसभेतील ‘हास्यविनोद’
अजित पवार यांच्या निधनानंतरच्या परिस्थितीवर भाष्य करताना राऊत यांनी खळबळजनक विधान केले. “अजितदादांच्या शोकसभेत मी पाहिले की, पहिल्या रांगेत हास्यविनोद सुरू होते. त्यांच्या कुटुंबातील एक तरुण नेता (रोहित पवार) त्यांच्या मृत्यूचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतोय, आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहू,” असे ते म्हणाले. तसेच रोहित पवारांच्या विमान कंपनीवरील डीजीसीएच्या बंदीला त्यांनी रोहित पवारांचा ‘लहान विजय’ संबोधले.
पंतप्रधान मोदींवर घणाघाती आरोप
राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेचे समर्थन करताना राऊत म्हणाले, “मोदींनी भारत आधी अदानींना विकला आणि आता उरलेला भारत अमेरिकेला विकत आहेत. राहुल गांधी जे बोलत आहेत ते शंभर टक्के सत्य आहे. उद्योगपती मित्रांसाठी भारत मातेचा सौदा केला जात आहे.”



