मुंबई

Sanjay Raut : नाशिक वादावर संजय राऊतांची मवाळ भूमिका; “मंत्र्यांनी नाक घासले आहे, आता विषय संपवावा”

•डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने पेटला होता वाद; महिला अधिकाऱ्याच्या धैर्याचे कौतुक, पण ‘ॲट्रॉसिटी’च्या मागणीवर राऊतांचा वेगळा सूर

मुंबई l नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत असताना, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मात्र या प्रकरणात समंजस भूमिका मांडली आहे. “मंत्र्यांनी माफी मागितली आहे, आता हा विषय अधिक ताणू नये,” असे मत राऊतांनी व्यक्त केले आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

गिरीश महाजन यांनी या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केल्यानंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,”26 जानेवारीला भारताला संविधान मिळाले, देश प्रजासत्ताक झाला. अशा दिवशी सोहळ्याची सुरुवातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने व्हायला हवी, हे सत्य आहे. पण आता कॅबिनेट मंत्र्यांनी जाहीर माफी मागितली आहे, ‘नाक घासले’ आहे, तर या विषयावर पडदा पडला पाहिजे. त्या महिला अधिकाऱ्याने गणवेशात असतानाही जो धाडसी निषेध नोंदवला, त्याबद्दल त्यांचे कौतुकच आहे. पण आता विषय फार ताणण्याची गरज नाही.”

प्रकाशा आंबेडकरांचा महिला कर्मचाऱ्यांना पाठिंबा

दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. “संविधानाचा सन्मान राखण्यासाठी तुम्ही जे धाडस दाखवले, त्याबद्दल आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे,” असे आश्वासन प्रकाश आंबेडकरांनी दिले आहे.

नेमकी मागणी काय?

वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी केवळ तक्रारच दिली नाही, तर गिरीश महाजन यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात केली आहे. “ज्यांनी संविधान दिले, त्यांचे नाव विसरणे ही साधी चूक असू शकत नाही,” असा पवित्रा या महिला कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0