Sanjay Raut : ‘सोशल मीडिया’ बंदीमुळे नेपाळ सरकार कोसळले; अराजकतेवरून संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

•’अशी स्थिती कुठल्याही देशात येऊ शकते, सावधान!,’ राऊत यांचे सूचक ट्विट
ANI :- नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून मोठा राजकीय आणि सामाजिक उद्रेक झाला असून, याचा थेट परिणाम म्हणून तेथील सरकार कोसळले आहे. सोशल मीडियावरील निर्बंधांमुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी संसद, न्यायालय आणि गृहमंत्र्यांच्या घरांवर हल्ला करून जाळपोळ केली. यानंतर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, ते देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट करत भारतालाही इशारा दिला आहे.
राऊत यांचे सूचक ट्विट
नेपाळमधील या अराजकतेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी ट्विट केले आहे की, “Nepal today! ये स्थिती किसी भी देश मे पैदा हो सकती है! सावधान! भारत माता की जय! वंदे मातरम!” या ट्विटमध्ये त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेन्शन करत केंद्रातील सरकारला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे. आपल्या हक्कांसाठी जागृत झालेला युवक असा दिसतो, असे म्हणत राऊत यांनी केंद्र सरकारला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
नेपाळमधील सत्तांतर
नेपाळमधील या जनआंदोलनामुळे अनेक मंत्र्यांनी देश सोडला आहे, तर पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिला आहे. आंदोलकांनी आता काठमांडूचे 35 वर्षीय महापौर बालेन शाह यांना पंतप्रधानपदासाठी नवीन नेतृत्व म्हणून पुढे केले आहे. बालेन शाह, जे एक रॅपर म्हणूनही प्रसिद्ध आहेत, त्यांचा हा प्रवास नेपाळमधील राजकीय बदलाचे एक महत्त्वाचे प्रतीक बनला आहे.
नेपाळमध्ये झालेला हा सत्तांतर केवळ सोशल मीडियावरील बंदीमुळे झाला नसून, देशातील नागरिकांचा वाढता असंतोष आणि लोकशाही हक्कांची मागणी यालाही हे कारण ठरले आहे. राऊत यांच्या ट्विटमुळे या घटनेला भारतीय राजकारणातही एक वेगळीच किनार मिळाली आहे.


