ठाणेमुंबई
Trending

Sanjay Raut : “मुंबईचा महापौर ‘मराठीच’ आणि ‘ठाकरे बंधूंचा’ होणार! दिल्लीचे जोडे उचलणारा महापौर नको” – संजय राऊत

Sanjay Raut On Mumbai BMC Election : राज-उद्धव युती ‘दिल-दिमाग से बनी हुई’; मनसेला महाविकास आघाडीत निमंत्रण देण्याचा अधिकार एकट्याला नाही.

मुंबई :- मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. मुंबईचा महापौर हा मराठीच होणार असून, तो ‘अस्सल भगव्याचा वाहक’ असेल, असा ठाम दावा त्यांनी केला.

“दिल्लीचे जोडे उचलणारा महापौर नको”

राऊत म्हणाले की, “भाजप व मिंदे सांगतात तसा महापौर होणार नाही. दिल्लीचे जोडे उचलणारा कोणताही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही.” ते पुढे म्हणाले, “जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या 105 हुतात्म्यांना साष्टांग दंडवत घालेल आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राची गर्जना करेल, असाच मुंबईचा महापौर होईल. तो बाणा, ते रक्त केवळ शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्येच आहे. मी हम या शब्दाचा वापर केला आहे, म्हणजे ठाकरे बंधूंचाच महापौर होणार.”

‘राज-उद्धव युती दिल-दिमाग से बनी हुई’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, यांच्या दोघांची युती ही ‘दिल और दिमाग से बनी हुई है’. ही केवळ राजकीय युती नसल्याचा दावा त्यांनी केला.

मनसेला महाविकास आघाडीत निमंत्रण देण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, “महाविकास आघाडी ही तीन प्रमुख पक्षांची बनलेली आहे. राज ठाकरे यांना आघाडीत येण्याचे निमंत्रण देण्याचा अधिकार मला एकट्याला नाही, यासाठी तीनही पक्षांचे मत गरजेचे आहे.” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक परिस्थितीचा विचार करून वेगळी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे-अजित पवार ‘अमित शहांच्या कंपन्या’

महायुतीवर टीका करताना संजय राऊत यांनी शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांना ‘कंपनी’ संबोधले.

शिंदे-अजित पवार: “महायुतीमधील शिंदे यांचा पक्ष ही अमित शहा यांची नवीन कंपनी आहे. अजित पवार यांचा पक्ष देखील अमित शहा यांची एक कंपनी आहे. मुख्य कंपनी भाजप आहे, बाकी सर्व शेअर होल्डर आहेत. या सर्व अमित शहा यांच्या बेनामी प्रॉपर्टी आहेत. शहा यांना जेव्हा वाटेल त्यावेळी ते कंपनी बंद करतील.”

फडणवीसांचा ‘बुर्खा फाटला’

राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्या मदतीवरून राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “काल अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचा बुर्खा फाडला,” असा टोला लगावत राऊत म्हणाले की, केंद्राने मदतीसाठी प्रस्ताव पाठवलेला नसल्याचे शहा यांनी सांगितले. “एका अर्थाने देवेंद्र फडणवीस अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत, याच्यावर शहा यांनी शिक्कामोर्तब केले आहे.”

महाराष्ट्राने प्रस्ताव न पाठवल्यास केंद्र सरकारने गुजरातप्रमाणे महाराष्ट्रालाही प्रस्तावाशिवाय मदत करायला हवी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, शेतकऱ्यांकडून ऊस घेणाऱ्या साखर कारखान्यांवर भार लावण्याऐवजी गौतम अदानी, अंबानी यांच्यावर भार लावावा, अशी मागणी त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0