
Sanjay Raut On Ganesh Naik : ठाणे-नवी मुंबईतील भूखंड घोटाळ्यावरून राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार; भाजपमध्ये राहून शिंदेंशी लढता येणार नाही – राऊतांचे विश्लेषण
नवी दिल्ली/मुंबई | नवी मुंबई आणि ठाण्यातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले असून महायुतीतील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. भाजप नेते गणेश नाईक Ganesh Naik आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यात भ्रष्टाचार तसेच सत्ताधाऱ्यांच्या अरेरावीवरून सुरू असलेल्या संघर्षात आता शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी उडी घेतली आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना एक ‘प्रेमाचा सल्ला’ देत, भाजप सोडून थेट ‘स्वगृही’ म्हणजे शिवसेनेत परतण्याचे जाहीर आवाहन केले आहे. या प्रवृत्तीशी लढायचे असेल तर सत्तेबाहेर पडून रणशिंग फुंकावे लागेल, असेही राऊतांनी यावेळी ठणकावून सांगितले.
संजय राऊत यांनी गणेश नाईक यांच्या भूमिकेचे समर्थन करताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, गणेश नाईक ज्या भ्रष्टाचाराविरोधात आणि अरेरावीविरुद्ध लढत आहेत, त्या प्रवृत्तीला शेवटी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांचा छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपमध्ये राहून ही लढाई कधीही टोकाला जाऊ शकणार नाही किंवा त्यांना यश मिळणार नाही. जर नाईकांना खरोखरच ही लढाई जिंकायची असेल, तर त्यांनी पुन्हा शिवसेनेत यावे आणि इथून संघर्षाची सुरुवात करावी, मग विजय त्यांचाच होईल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.
ठाणे आणि नवी मुंबईतील मोक्याचे भूखंड बिल्डरांच्या घशात घातले गेल्याचा गंभीर आरोप करत राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. रस्ते आणि बगीच्यांसाठी राखीव असलेल्या जमिनी कशा प्रकारे वाटल्या गेल्या आणि त्यात कसा भ्रष्टाचार झाला, हे नाईकांनीच मांडले आहे. “एकनाथ शिंदे यांना एक दिवस तुरुंगात जावे लागेल,” या गणेश नाईकांच्या जुन्या विधानाचा संदर्भ देत राऊतांनी शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सत्तेत राहून सत्तेच्या विरोधात लढणे शक्य नसल्याने नाईकांनी आता ठोस निर्णय घ्यावा, अशी साद राऊतांनी घातली आहे.
दुसरीकडे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना निवडणुकीत समोरासमोर लढण्याचे आव्हान दिल्याने हा संघर्ष आता अधिक वैयक्तिक स्तरावर पोहोचला आहे. महायुतीमधील या दोन बलाढ्य नेत्यांमधील कलह आता विकोपाला गेला असून, संजय राऊतांच्या निमंत्रणाने नवी मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. आता गणेश नाईक राऊतांचा हा ‘स्वगृही’ परतण्याचा सल्ला शिरसावंद्य मानतात की भाजपमध्येच राहून लढा सुरू ठेवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



