Sanjay Raut : ‘भ्रष्टाचाराने सत्ता मिळवली तर नेपाळ होणारच’, संजय राऊत यांचा शिंदे गटाला इशारा

- पोलीस तक्रारीनंतर संजय राऊत आक्रमक; ‘शिंदे लोक घाबरले आहेत’ म्हणत साधला निशाणा
मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात ‘नेपाळसारखी’ परिस्थिती निर्माण होऊ शकते असे विधान केल्यानंतर, त्यांच्याविरोधात ‘शिंदे गटाने’ पोलीस तक्रार दाखल केली. यावर संजय राऊत यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “भ्रष्टाचार करून पैसा आणि सत्ता मिळवली तरी कधीतरी नेपाळ होणारच. ये डर अच्छा है!” अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
राऊत यांचा ‘X’ वरील हल्ला
शुक्रवारी सकाळी संजय राऊत यांनी एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली. “मी नेपाळी तरुणांचा लढा भ्रष्टाचार आणि हुकूमशाही विरुद्ध असल्याचे सांगताच महाराष्ट्रात मिंधे गटाने माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. आज हेच मूर्ख लोक पोलीस आयुक्तांना भेटून माझ्यावर कारवाईची मागणी करत आहेत. खुशाल करा अशी मागणी!” असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली.
‘ये डर अच्छा है!’
राऊत पुढे म्हणाले की, “हे लोक घाबरले आहेत! भ्रष्टाचार करून पैसा आणि सत्ता मिळवली तरी कधीतरी नेपाळ होणारच, ये डर अच्छा है!” त्यांनी नेपाळच्या तरुणांनी क्रांतीचा मार्ग दाखवला आणि भ्रष्ट शासनकर्त्यांना रस्त्यावर आणले, त्यामुळेच मिंधे लोक घाबरले आहेत, असेही म्हटले.


