मुंबई

Sanjay Raut : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड ‘गायब’? राजकीय वर्तुळात खळबळ

•संजय राऊत यांचे अमित शाहांना पत्र; ‘धनखडांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल चिंता’

मुंबई :- देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर ते कुठे आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरले असून, शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून धनखड यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल माहितीची मागणी केली आहे.

जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी राज्यसभेचे कामकाज अचानक थांबवल्यानंतर राजीनामा दिला. त्यानंतर ते सार्वजनिक जीवनातून अचानक दिसेनासे झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी यापूर्वीही हा मुद्दा उचलून धरत, “विरोधकांना संपवण्याची परंपरा चीन आणि रशियामध्ये आहे,” असे म्हणत मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते.

सध्या याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, संजय राऊत यांनी अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. 21 जुलै रोजी राज्यसभेचे कामकाज त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर घडलेल्या घटना चिंताजनक आहेत.” त्यांनी धनखड यांच्या आरोग्याबाबत तातडीने माहिती देण्याची मागणी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची आठवण करून दिली, तर संजय राऊत यांनी विरोधकांना संपवणाऱ्या देशांशी तुलना करत सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये धनखड यांचे समर्थन करणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्याला सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याने या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0