Mumbai Train Bomb Blast Case : 11 जुलै 2006 लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपी निर्दोष ठरले

Mumbai Train Blast Case : उच्च न्यायालयाचा मोठा निकाल; सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द
मुंबई | मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये 11 जुलै 2006 रोजी घडवण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या सर्व 12 आरोपींची उच्च न्यायालयाने सोमवारी निर्दोष सुटका केली. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. सत्र न्यायालयाने दिलेली फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा रद्द करत आरोपींची तातडीने जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. Mumbai Train Blast Case
या प्रकरणात साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळी मिळालेले साहित्य व आरोपींचे कबुलीजबाब या तीन आधारांवर खटला चालवण्यात आला. मात्र विशेष खंडपीठाने या तिन्ही बाबतीत गंभीर त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळली. अनेक साक्षीदारांनी घटनानंतर चार-पाच वर्षांनी आरोपींना ओळखल्याचे सांगितले, जे न्यायालयाने अविश्वसनीय मानले.
या प्रकरणात सत्र न्यायालयाने 13 आरोपींपैकी 5 जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. एका आरोपीचा खटला चालू असतानाच मृत्यू झाल्याने तो वगळण्यात आला. शिक्षाविरोधातील अपील 2015 मध्येच दाखल झाले होते, परंतु विशेष खंडपीठ स्थापन होण्यास विलंब झाला. अखेर, 19 वर्षांनंतर उच्च न्यायालयाने या सर्व आरोपींना निर्दोष घोषित करून एका दीर्घकाळ चाललेल्या खटल्याचा शेवट केला.
पाच महिने चाललेली सुनावणी, 2000 पानी निकालपत्र
या खटल्यात 92 सरकारी व 50 बचाव पक्षाचे साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यातील पुरावे 169 खंडांमध्ये संकलित आहेत. विशेष न्यायालयाचे निकालपत्र तब्बल 2000 पानांचे होते. विशेष खंडपीठासमोर पाच महिने नियमित सुनावणी झाली. निकाल 31 जानेवारी रोजी राखून ठेवण्यात आला होता, जो अखेर सोमवारी जाहीर झाला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व आरोपींना निकाल ऐकवण्यात आला.


