मुंबईठाणे
Trending

Sanjay Raut : राज्यावर ‘आपत्ती’ सरकारची! तीन दिवसांच्या पावसाने उघड झाली ‘फेकनाथां’ची पोलखोल

Samna On Sarkar : सरकारच्या निष्क्रियतेवर ‘सामना’तून ठाकरे गटाचा हल्ला; ‘मुंबई बुडाली’ म्हणणारे भाजपाचे पोपट आता कोणत्या बिळात लपले? ‘रेड अलर्ट’ देऊन सरकारची जबाबदारी संपते का? ठाकरे गटाचा संतप्त सवाल.

मुंबई :- गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने रौद्र रूप धारण केल्यामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात निर्माण झालेल्या स्थितीवरून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्रातून म्हणजेच ‘सामना’च्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

“राज्यावर नैसर्गिक आपत्ती नव्हे, तर हे सरकार हीच एक ‘आपत्ती’ आहे,” अशा शब्दांत ठाकरे गटाने सरकारवर हल्लाबोल केला आहे. पावसाच्या नैसर्गिक आपत्तीशी हे सरकार काय लढणार? असा सवाल करत तीन दिवसांच्या पावसाने सरकारची पोलखोल झाली असल्याचा दावा ‘सामना’तून करण्यात आला आहे.

‘मुंबई खड्डेमुक्त करणार’ दावे पोकळ

गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईचे सर्व रस्ते जलमय झाले आहेत. खड्ड्यांमुळे आधीच धोकादायक बनलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने धोका आणखी वाढला आहे. “यंदा मुंबई तुंबणार नाही, संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त करू,” असे दावे करणाऱ्या सरकारने केलेले सर्व दावे पोकळ असल्याचे या दोन दिवसांच्या पावसाने सिद्ध केले आहे, असे ‘सामना’मध्ये म्हटले आहे. “मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना ‘मुंबई बुडाली’ अशी आवई उठवणारे भाजपाचे वाचाळवीर पोपट आता कोणत्या बिळात लपले आहेत?” असा खोचक टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

आपत्कालीन कक्ष झोपला होता का?

हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ दिल्यावर केवळ पत्रक काढून सरकार मोकळे झाले. पण जलमय होणाऱ्या मुंबईला वाचवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. “मुंबई शहराला तीन-तीन पालकमंत्री असताना आणि मुंबई जलमय होत असताना हे तिन्ही पालकमंत्री काय करत होते? केवळ जनतेला ‘रेड अलर्ट’चा इशारा दिला म्हणजे सरकारची जबाबदारी संपते का?” असे अनेक सवाल ‘सामना’ने उपस्थित केले आहेत.

शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

मुंबईसोबतच ठाणे, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातही अतिवृष्टीने थैमान घातले आहे. एकट्या मराठवाड्यातील शेतात पाणी शिरल्याने 2.80 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मागील नुकसानीचे पैसे अद्याप मिळाले नसताना केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या पंचनाम्यांनी शेतकऱ्यांना काय दिलासा मिळणार? असा संतप्त सवालही ‘सामना’तून विचारण्यात आला आहे. यामुळे एकीकडे नैसर्गिक आपत्तीने सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले असताना, दुसरीकडे सरकारची निष्क्रियता या संकटात भर घालत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0