ठाणेमुंबई
Trending

Sandeep Deshpande : “मनसे स्वतंत्र, ‘मविआ’च्या चर्चांशी देणंघेणं नाही!” राज ठाकरे योग्य वेळी भूमिका मांडतील – संदीप देशपांडे

Sandeep Deshpande On Congress : सत्ताधाऱ्यांवर ‘तेजवाणी, ललवाणी, वासवाणी’ टोला; ‘दिवस चांगले सुरू आहेत’, म्हणत केली खोचक टीका

मुंबई :- मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या युतीबद्दल तसेच मनसेला महाविकास आघाडीत (MVA) घेण्याबद्दल चर्चा सुरू असतानाच, मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आपली पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे हा पक्ष स्वतंत्र असून, MVA च्या अंतर्गत चर्चेत आम्हाला काही रस नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

MVA च्या चर्चेवर स्पष्टीकरण

“महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाविकास आघाडीचा भाग नाही. आमचा पक्ष स्वतंत्र असून त्यांचा निर्णय राज ठाकरे हे घेत असतात,” असे देशपांडे यांनी स्पष्ट केले. “वर्षा गायकवाड आणि उद्धव ठाकरे काय बोलतात? उद्धव ठाकरे वर्षा गायकवाड यांना काय बोलतात, त्या पवारांना काय बोलतात याच्याशी आम्हाला काही देणघेणं नाही, आमच्या पक्षाची भूमिका काय हे योग्य वेळी राज ठाकरे जाहीर करतील,” असे ते म्हणाले.

सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

संदीप देशपांडे यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांवर आणि राजकीय परिस्थितीवर जोरदार टीका केली.

“तेजवाणी, ललवाणी, वासवाणी” टोला: “सध्या तेजवाणी, ललवाणी, वासवाणी या सर्वांचे दिवस चांगले सुरू आहेत,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.

नाराजीनाट्यावर टीका: महायुतीतील वाद हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. ते काय वागत आहेत हे जनता बघत आहे, जनता दोघांविषयी निर्णय घेईल.

सन्मानावर प्रश्न: “खासदार आणि आमदार यांना सन्मान द्या म्हणून जर जीआर काढावा लागत असेल, तर त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात काय भावना आहे हे दिसून येते,” असे म्हणत त्यांनी सध्याच्या लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला.

निवडणुका आणि पैशांचे राजकारण

मनपा निवडणुकीसाठी मतदार तपासणी सुरू असून लवकरच आक्षेप नोंदवले जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच, सत्ताधाऱ्यांकडून पैशांचे वाटप सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी खोचक टीका केली. “आता पैसे वाटायचे आणि निवडून यायचे असे सत्ताधाऱ्यांनी सुरू केले आहे. आम्हीही बँकेला एक लेटर देत 10 ग्रॅम सोने वाटायचे असा खोचक टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

छत्रपती शिवाजी महाराजांवरून टीका: “राज्य सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रेम आणि आदर नाही. हे केवळ आपल्या स्वार्थी राजकारणासाठी महाराजांचे नाव वापरत आहेत,” अशी टीका त्यांनी नवी मुंबईतील पुतळा उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर केली.

‘यूपी-बिहार’सारखी परिस्थिती

राज्यात निवडणुका ज्या पद्धतीने होत आहेत, त्या लाजिरवाण्या आहेत. “एका महिलेला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 50 पोलिसांची सुरक्षा घ्यावी लागते. यापूर्वी यूपी आणि बिहारमध्ये असे प्रकार घडत होते, आता ते महाराष्ट्रा घडत आहे. राज्यातील सामाजिक स्वास्थ्य ढासळत चालल्याचे हे लक्षण आहे,” असे देशपांडे म्हणाले.

अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावर भाष्य: कल्याण-मुलुंड लोकलमध्ये भाषिक वाद आणि मारहाणीमुळे 19 वर्षीय अर्णव खैरेने आत्महत्या केल्याच्या घटनेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “महाराष्ट्रामध्ये जी परप्रांतीय लोकांची दादागिरी सुरू आहे, ती मोडून काढण्याचे काम महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येत केले पाहिजे. या घटनेवर भाजपचे लोक गप्प का आहेत? त्या मुलाला न्याय मिळावा यासाठी मनसे त्यांच्या कुटुंबीयांच्या सोबत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0