
Raju Patil On Shivsena : राजू पाटलांचा शिंदे गटावर हल्लाबोल; ‘गद्दारांची टोळी’ म्हणत केली जोरदार टीका
कल्याण-डोंबिवली :- आगामी निवडणुका जवळ आल्याने पक्षप्रवेशाचे सत्र सुरू झाले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) माजी नगरसेवक राजन मराठे आणि त्यांच्या पत्नी ज्योती मराठे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) चे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी आज (25 ऑगस्ट) त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशावर मनसेचे माजी आमदार आणि कल्याण-डोंबिवलीतील प्रमुख नेते राजू पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून शिवसेना (शिंदे गट) आणि प्रवेश केलेल्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
राजू पाटील यांची आक्रमक प्रतिक्रिया
राजू पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरत आहे. 50 खोके घेऊन हे फुटले आणि आता इतरांना खोके वाटत फिरत आहेत. यांना काय कळणार इमान आणि निष्ठा म्हणजे काय?”
याचसोबत त्यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. “यांनी तर फक्त स्वार्थासाठी आपल्याच नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला आहे. या मिंधे गटामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागला आहे.”
प्रवेश केलेल्या नेत्यांवर टीका करताना पाटील म्हणाले की, “ज्यावेळी स्वत:ला पोरगं होत नाही तेव्हा दुसऱ्याचं मूल मांडीवर घ्यावं लागतं. मिंधे गटाची हीच अवस्था आहे. आणि ज्यांना खांद्यावर घेतलं तीच लोकं डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाली आहेत.”
या सर्व प्रकारानंतर राजू पाटील यांनी आपला निर्धार व्यक्त करत म्हटले की, “पण या गद्दारांना गाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.” पाटील यांच्या या प्रतिक्रियेमुळे कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात आणखी तणाव वाढण्याची शक्यता आहे.


