Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने सांगितला टीम इंडियाच्या विजयाचा ‘टर्निंग पॉईंट’! इशानची फटकेबाजी अन् गोलंदाजांच्या शिस्तीवर ‘मास्टर ब्लास्टर’ फिदा

Sachin Tendulkar On India Vs Pakistan : “दोन्ही डावांतील पॉवरप्लेने सामना फिरवला”; भारताच्या दणदणीत विजयानंतर सचिनची विशेष पोस्ट व्हायरल
मुंबई :- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानला सर्वच आघाड्यांवर चितपट केले. भारताने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ केवळ 114 धावांत गारद झाला. या ऐतिहासिक विजयानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भारतीय संघाच्या कामगिरीचे विश्लेषण केले आहे.
पॉवरप्लेमध्येच विजयाची मुहूर्तमेढ
सचिन तेंडुलकरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भारताने दोन्ही डावांत पॉवरप्लेमध्ये जी कामगिरी केली, तिथेच सामना प्रतिस्पर्ध्यांच्या हातातून निसटला.” पहिल्या डावात अभिषेक शर्मा लवकर बाद झाल्यानंतर इशान किशनने जी स्फोटक सुरुवात करून दिली, त्यामुळे पाकिस्तानवर दडपण आले. इशानने केवळ 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत 175 धावांच्या आव्हानाचा पाया रचला. सचिनच्या मते, इशानची 77 धावांची ही खेळी सामन्याला कलाटणी देणारी ठरली.
गोलंदाजांची शिस्तबद्ध कामगिरी
केवळ फलंदाजीच नव्हे, तर भारताच्या अचूक गोलंदाजीचेही सचिनने विशेष कौतुक केले आहे. फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी सुरुवातीच्या दोन षटकांत ३ बळी घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. सचिनने पुढे लिहिले, “दुसऱ्या डावात पाहायला मिळालेली अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजी यामुळे भारताचा विजय सोपा झाला. संपूर्ण सामन्यात भारतच ‘ड्रायव्हिंग सीट’वर होता.”
अक्षरच्या फिरकीने उरलीसुरली आशा संपवली
पाकिस्तानकडून उस्मान खानने 44 धावा करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अक्षर पटेलच्या एका चेंडूवर इशान किशनने चपळाईने त्याला यष्टीचित (Stumping) केले आणि पाकिस्तानची उरलीसुरली आशाही संपुष्टात आली. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनीही मधल्या षटकांत प्रभावी मारा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
या विजयामुळे भारताचा सुपर-8 मधील प्रवेश निश्चित झाला असून, संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गजाने केलेल्या या कौतुकामुळे युवा खेळाडूंचा आत्मविश्वास अधिकच दुणावला आहे.



