मुंबई

Rohit Pawar : ईडीचा पुरवणी बाण रोहित पवारांवर, ‘माझं ऐकलं नाही म्हणून कारवाई’ – पवारांचा पलटवार

•”महाराष्ट्र लाचारीला झुकत नाही”, रोहित पवारांचा निर्धार

मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत ईडीने आणखी भर घातली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घडामोडीनंतर रोहित पवारांनी सोशल मीडियावरून थेट प्रतिक्रिया दिली असून, “कोणाचं ऐकलं नाही म्हणूनच माझ्यावर कारवाई झाली,” असं सांगत त्यांनी राजकीय दबावाचा आरोप केला आहे.

एक्स (पूर्वीचं ट्विटर) वरील पोस्टमध्ये पवार म्हणतात, “हे आता संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालं आहे की, मी कोणाच्या दबावाला बळी न पडल्यानेच ही कारवाई झाली आहे. पण महाराष्ट्र हे लाचारी स्वीकारत नाही, ना फितुरी झेलत नाही.”

रोहित पवारांनी काय म्हटलं?

“कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर आहे. याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईलच”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

तसेच विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे, महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे”, असा सूचक इशाराही आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

ईडीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित गैरव्यवहार प्रकरणात रोहित पवार यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केलं आहे. दरम्यान, बारमती ॲग्रोसह अन्य कंपन्यांनी कथित एमएससीबी गैरव्यवहार प्रकरणात संशयास्पद व्यवहार केल्याचा आरोप आहे. तसेच यामाध्यमातून तोट्यात असलेले साखर कारखाने लिलावाद्वारे विकत घेतल्याचा ईडीचा आरोप आहे.

vivek

Recent Posts