मुंबईठाणे
Trending

Ramdas Kadam : “मी गद्दार, नमकहराम व हरामखोराला उत्तर देत नाही!” रामदास कदमांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी कडवट शब्दांत टाळले

Ramdas Kadam On Uddhav Thackeray : “देशाला एका पक्षाचे नव्हे, तर खऱ्या पंतप्रधानांची गरज”; सोनम वांगचुक, मणिपूर आणि आसामच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा.

पुणे :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुणे दौऱ्यावर असताना सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर थेट प्रतिक्रिया देणे टाळले. मात्र, त्यांना उद्देशून उद्धव ठाकरे यांनी ‘गद्दार, नमकहराम व हरामखोर’ अशा अत्यंत कडवट शब्दांत टीका केली.

रामदास कदमांना उत्तर देण्यास नकार

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी गद्दार व नमकहारांना उत्तर देत नाही. मला ते देण्याची गरज वाटत नाही. ठाकरे म्हणजे काय? हे संपूर्ण महाराष्ट्र व देश ओळखतो. त्यामुळे मी त्या गद्दाराला व हरामखोराला उत्तर देणार नाही.”

शिवसैनिकांनी अभूतपूर्व दसरा मेळावा भरवला

कालचा दसरा मेळावा अभूतपूर्व झाला, याचे श्रेय शिवसैनिकांना जाते. शिवाजी पार्कवर चिखल आणि तळे झाले असतानाही केवळ मुंबईचेच नव्हे, तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शिवसैनिक स्वकष्टाने आले. “पाऊस पडत असतानाही कुणीही जागचे हलले नाहीत. आलेल्या लोकांना कोंडून ठेवण्याची गरज आम्हाला वाटत नाही, जी इतरांना कदाचित वाटत असेल,” असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

‘देशाला आता खऱ्या नेतृत्वाची गरज’

केंद्रातील भाजप सरकारवर टीका करताना ठाकरे यांनी देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.

मोदी सरकारवर टीका: “आपल्या देशाला आता पंतप्रधान, गृहमंत्री व अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे. आत्ता जे बसलेत ते एका पक्षाचे मंत्री बसलेत, ते देशाचे नाहीत.”

सोनम वांगचुक प्रकरण: सोनम वांगचुक यांनी काय गुन्हा केला की त्यांच्यावर थेट रासुका (NSA) लावण्यात आला? काल परवापर्यंत ते पंतप्रधानांची स्तुती करत होते, तेव्हा ते देशप्रेमी होते का?

ईशान्येकडील प्रश्न: मणिपूर, लेह-लडाख किंवा आसाममध्ये आदिवासी रस्त्यावर उतरले असतानाही त्याची एकही बातमी येत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. “जिथे जिथे अन्याय दिसेल त्याला लाथ मारणे हे आमच्या घराण्याची परंपरा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या हिंदुत्वावर गंभीर प्रश्न

भाजपच्या हिंदुत्वावर शरसंधान साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही भाजपला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले का?”

सौगात ए मोदी: सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत जातात. भाजप अल्पसंख्यकांना ‘सौगात ए मोदी’ देते. मग तुम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदूत्व सोडले, असे कसे म्हणता? सौगात ए नेहरू किंवा सौगात ए इंदिरा गांधी कधी ऐकले आहे का?

क्रिकेट आणि पाक: ज्यांनी हिंदूंना मारले त्या पाकिस्तानसोबत तुम्ही क्रिकेट मॅच खेळू कशी शकता?

‘लव्ह जिहाद’ची नीती: “भाजपने जे केले अमर प्रेम आणि इतरांनी केले तर ते लव्ह जिहाद, असे कसे असू शकते?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

मनसेसोबतच्या युतीवर सूचक भाष्य

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की, आम्ही 2005 मध्ये वेगळे झालो होतो, पण आत्ता एका मुद्यावर आम्ही एकत्र आलो. “आम्ही एकत्र आल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणलेत. मराठी माणूस एकवटल्याने काय होणार? याची त्यांना भीती वाटत आहे,” असे सूचक विधान त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0