
IAS Officer Rajesh Agarwal : कोण आहेत राजेश अगरवाल? – तंत्रज्ञान, वित्तीय सुधारणा आणि सामाजिक कल्याणात प्रभावी काम; केंद्रातील डिजिटल इंडिया मोहिमेत महत्त्वाचा वाटा
मुंबई :- महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात मोठे फेरबदल होणार असून, 1989 बॅचचे ज्येष्ठ आयएएस अधिकारी राजेश अगरवाल यांच्याकडे राज्याच्या मुख्य सचिव पदाची महत्त्वाची जबाबदारी येणार आहे. सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे 30 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर 1 डिसेंबर 2025 पासून राजेश अगरवाल हे राज्याचे नवे मुख्य सचिव असतील.
अगरवाल यांच्या कामाचा प्रभावी अनुभव
राजेश अग्रवाल यांनी प्रशासनात दीर्घ अनुभव घेतला आहे. त्यांचे काम आधुनिक तंत्रज्ञान, वित्तीय सुधारणा आणि सामाजिक कल्याण योजनांमध्ये प्रभावी ठरले आहे. त्यांची ही कामगिरी त्यांना देशातील प्रगतीशील प्रशासकांपैकी एक बनवते.
शिक्षण आणि तंत्रज्ञान:
अग्रवाल यांनी आयआयटी दिल्ली येथून बी.टेक (Computer Science) पदवी प्राप्त केली आहे. प्रशासकीय सेवेत आल्यानंतर त्यांनी शासन व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर कसा प्रभावी ठरू शकतो, यावर सातत्याने काम केले.
राज्य प्रशासनातील भूमिका महाराष्ट्र कॅडरमध्ये नियुक्तीनंतर त्यांनी अकोला आणि जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून विकासकामांना गती दिली.
तसेच, मुंबई महानगरपालिकेत डेप्युटी कमिशनर पदावर असताना त्यांनी शहरी व्यवस्थापनाचे विविध प्रकल्प यशस्वी केले. महाराष्ट्र राज्याच्या वित्त आणि माहिती तंत्रज्ञान विभागात त्यांनी धोरणात्मक निर्णय, आर्थिक शिस्त आणि डिजिटल प्रशासनाला बळ देण्यावर भर दिला.
केंद्रातील दखल राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्तीपूर्वी ते भारत सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे (DEPwD) सचिव म्हणून कार्यरत होते. केंद्रात कार्यरत असताना त्यांनी आधार, जनधन, डिजिलॉकर यासारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये योगदान दिले. डिजिटल इंडिया मोहिमेला चालना देण्यात त्यांचा हातभार महत्त्वाचा मानला जातो.
राजेश अग्रवाल यांची तंत्रज्ञानाभिमुख विचारसरणी, जमिनीवरची कार्यशैली आणि केंद्र-राज्य पातळीवरील अनुभव यामुळे महाराष्ट्र प्रशासनाला नवे बळ मिळणार असून, राज्याच्या विकासयात्रेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


