Anant Chaturthi 2025 : अनंत चतुर्दशीनिमित्त बाप्पाला निरोप, विसर्जनासाठी मुंबई सज्ज

•पावसाच्या सरींमध्ये ‘तेजूकाय’ गणपती बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ; थोड्याच वेळात ‘लालबागच्या राजा’ची मिरवणूक
मुंबई :- आज, अनंत चतुर्दशीच्या मंगलदिनी राज्यभरात दहा दिवसांच्या लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. मुंबईत सकाळपासूनच पाऊस सुरू असूनही गणेश भक्तांचा उत्साह कायम आहे. विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी पोलीस, महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
मुंबईतील प्रसिद्ध तेजूकाय मंडळाचा गणपती बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाने यंदाही शाडू माती आणि नैसर्गिक रंगाचा वापर करून 28 फुटांची भव्य गणेशमूर्ती तयार केली होती. मंडळाचे कार्यकर्ते स्वतःच या मूर्तीचे विसर्जन करतात.
त्याचप्रमाणे, गणेश गल्लीतील ‘मुंबईचा राजा’ ची विसर्जन मिरवणूकही सुरू झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या ‘लालबागच्या राजा’ ची मिरवणूकही थोड्याच वेळात सुरू होणार असून, त्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.


