
Raj Thackeray On Mumbai BMC Election : ‘भाजपकडे मोदी आणि EVM चा माज’; राज ठाकरेंचा सत्तेतील नेत्यांवर घणाघाती हल्ला
मुंबई | “येणारी महापालिका निवडणूक ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. काही लोकांना मुंबई आपल्या ताब्यात घेऊन ती ओरबाडायची आहे. हे संकट ओळखा आणि कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवण्यासाठी सज्ज व्हा,” अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी आगामी रणनीती स्पष्ट केली.
‘स्वार्थ शुल्लक, मराठी माणूस मोठा’
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यानंतर अनेक प्रभागांमध्ये जागावाटपावरून नाराजी असल्याची चर्चा होती. यावर राज ठाकरेंनी स्पष्ट भूमिका घेतली. “कुणाला किती जागा मिळाल्या, यावरून नाराज होऊ नका. वैयक्तिक स्वार्थ मराठी माणसाच्या हितापुढे अत्यंत शुल्लक आहे. दुसऱ्यांचे मुंबई विकण्याचे स्वप्न गाडण्यासाठी आता आपल्याला विसरून एकत्र यावे लागेल,” असे आवाहन त्यांनी केले.
सत्तेचा माज उतरवू!
भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले, “आज भाजपमध्ये जे माज करत आहेत, ते केवळ नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम (EVM) च्या जीवावर. पण सत्तेशिवाय राहण्याचे प्रसंग इतिहासात अनेकांवर आले आहेत. सत्तेत नसलो तरी आपल्या पक्षाचा दरारा आजही कायम आहे. भाजपमध्ये गेलेल्या लोकांवर टांगती तलवार आहे, हे विसरू नका.”
‘युतीचा धर्म’ पाळण्याचे आदेश
मनसेने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध न करता थेट ‘एबी फॉर्म’ (AB Form) हातात दिले आहेत. “आज आणि उद्या उमेदवारी अर्ज भरताना मोठा जल्लोष करा. युतीचा धर्म पाळायचा आहे, त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनाही तितकीच मदत करा. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई हातात राखायची आहे,” असा कानमंत्र राज ठाकरेंनी दिला.
प्रचारसभेत होणार मोठे गौप्यस्फोट
येत्या काळात होणाऱ्या प्रचारसभांमध्ये आपण अनेक गोष्टींचा पर्दाफाश करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. “मी सभांमध्ये अनेक जुन्या आणि नवीन गोष्टी बाहेर काढणार आहे. मुंबई हातातून जाऊ न देणे हीच आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.



