मुंबई

Raj Thackeray : राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी आणि उद्विग्नता! ‘बाळासाहेब नाहीत तेच बरं’, सध्याच्या राजकारणावर ओढले ताशेरे

•ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर; राज यांच्या ‘फॅमिली डॉक्टर’च्या किस्स्याने सभागृहात हास्यकल्लोळ; शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या बाळासाहेबांच्या आठवणींना दिला उजाळा

मुंबई l मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आज एक ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर आले. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत कधी मिश्किल टोलेबाजी केली, तर कधी सध्याच्या राजकारणावर अत्यंत प्रखर आणि उद्विग्न शब्दांत भाष्य केले.

“माझ्या डॉक्टरांनीही पक्ष बदलला की काय?”

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि स्वतःच्या प्रकृतीबाबत एक खुमासदार किस्सा सांगितला. “निवडणुकीपूर्वी उद्धव आजारी होते, त्यांना सर्दी-खोकला होता. आता तीच लक्षणं मला आहेत. मी माझ्या मराठी ‘यादव’ डॉक्टरांकडून औषधं घेऊन उद्धवना दिली, तर ते दोन दिवसांत बरे झाले. पण मी सहा दिवसांपासून तीच औषधं घेतोय, तरी मला बरं वाटत नाहीये. त्यामुळे मी परवा उद्धवना फोन करून विचारलं, की माझ्या डॉक्टरांनी पण पक्ष बदलला की काय?”, असे राज ठाकरे म्हणताच सभागृहात उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.

“बाळासाहेब आज नाहीत, हेच बरं झालं”

हास्यविनोदानंतर मात्र राज ठाकरे यांनी राजकारणातील सद्यस्थितीवर अत्यंत गंभीर भाष्य केले. “आज महाराष्ट्र आणि देशात गुलामांचा बाजार मांडला गेला आहे. पूर्वी चावडीवर माणसांचे लिलाव व्हायचे, तसे लिलाव आज महाराष्ट्रात सुरू आहेत. हे चित्र पाहून शिसारी येते. बाळासाहेबांनी शून्यातून गोष्टी उभ्या केल्या होत्या, आजची ही परिस्थिती पाहून तो माणूस किती व्यथित झाला असता! त्यामुळेच मला वाटते, हे चित्र पाहायला आज बाळासाहेब नाहीत, हेच बरं आहे,” असे उद्विग्न विधान त्यांनी केले.

शिवसेना सोडण्याच्या घटनेवर भाष्य बाळासाहेबांच्या आठवणीत रमलेल्या राज ठाकरेंनी 20 वर्षांपूर्वी पक्ष सोडण्याच्या निर्णयावरही मनमोकळेपणाने भाष्य केले. “मी जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा तो केवळ पक्ष सोडण्याचा नाही तर घर सोडण्याचा विषय होता. आता त्याला 20 वर्षे लोटली आहेत. या काळात अनेक गोष्टी मला उमजल्या आणि उद्धवनाही उमजल्या असतील. त्या गोष्टी आता सोडून द्या,” असे म्हणत त्यांनी जुन्या वादावर पडदा टाकण्याचे संकेत दिले.

या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत, राज ठाकरेंनी पुन्हा एकदा ‘ठाकरे ब्रँड’ एकवटण्याचे पुसटसे का होईना पण सूचक संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0