
Raj Thackeray On Double Voting : पहिल्या टप्प्यात २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीसाठी मतदान; राज ठाकरेंकडून निवडणूक आयुक्तांवर टीका
मुंबई :- अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रभरातील मतदारांना लागून राहिलेली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा केली.
निवडणूक कार्यक्रमाचा तपशील
पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल.
दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषद व महानगर पालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल.
राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रभरात नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे.
३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी केली जाणार आहे, तर १० डिसेंबर २०२५ रोजी या निवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर केले जातील.
राज ठाकरेंचा संताप
या निवडणुकीच्या घोषणेनंतरही मतदार यादीतील घोळ संपलेला नसल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. नवी मुंबईतील ‘सुलभ शौचालय’ आणि ‘आयुक्तांच्या बंगल्या’वरील मतदारांच्या प्रश्नावर निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ राज ठाकरे यांनी पोस्ट करत टीका केली आहे.
आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे… दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन…



