Raj Thackeray : ‘ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीचा निर्णय माझ्यावर सोडा’: राज ठाकरेंचे सूचक विधान

Raj Thackeray On Yuti : मनसे अध्यक्ष मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना म्हणाले, “हिंदी भाषिकांचा द्वेष न करता मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा”
मुंबई :- आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात महत्त्वपूर्ण सूचना देत, पक्षाला निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच्या संभाव्य युतीबाबतही सूचक विधान करून राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण केली आहे.
मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या या मेळाव्याला मोठ्या संख्येने मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईतील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे आदेश दिले.
‘हिंदी भाषिकांचा द्वेष नको’
राज ठाकरे म्हणाले, “मराठी भाषेसाठी मनसेने घेतलेली भूमिका प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. पण हे काम करताना कोणाचाही द्वेष करण्याची गरज नाही. हिंदी भाषिकांचा द्वेष न करता, आपल्या मराठी अस्मितेचा मुद्दा सकारात्मक पद्धतीने लोकांसमोर मांडा.” या विधानामुळे मनसेची भूमिका अधिक स्पष्ट झाल्याचे दिसून येते.
स्थानिक निवडणुकांसाठी कामाला लागा
यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आतापासूनच आपापल्या वॉर्डमध्ये महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे निर्देश दिले. “स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करा आणि जमिनीवर उतरून काम करा. कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्मविश्वासाने काम करा,” असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, पक्षातील अंतर्गत गटबाजीला थारा देऊ नका, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. “नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या स्वीकारून एकत्र काम करा आणि निवडणुकीच्या कामाला लागा,” असे त्यांनी बजावले.
‘युतीचा निर्णय माझ्यावर सोडा’
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच्या संभाव्य युतीबाबत विचारले असता, राज ठाकरे यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. “ठाकरेंच्या शिवसेनेसोबत काय करायचं ते माझ्यावर सोडा. मी योग्य वेळी यावर बोलेन, माझ्या आदेशाची वाट पाहा,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्यास सांगितले. “यावेळी मनसे 100 टक्के महापालिका निवडणुकीत सत्तेत येईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



