Raj Thackeray in Mumbai: मराठीच्या लढ्यात ठाकरे बंधूंनी पेटवली मशाल! राज ठाकरे 6 जुलैला मोर्चासाठी रस्त्यावर, उद्धव ठाकरे 7 जुलैला आझाद मैदानावर उतरतील मैदानात

Raj Thackeray in Mumbai: भाषेच्या मुद्द्यावर पुन्हा एकत्र येणार का ‘ठाकरे’ बंधू? चर्चेला उधाण
मुंबई | हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा मराठी अस्मितेच्या भोवऱ्यात सापडले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकारच्या त्रिभाषा धोरणाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, 6 आणि 7 जुलैला दोन वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा “ठाकरे बंधू एकत्र?” हा चर्चेचा प्रमुख मुद्दा ठरत आहे. Raj Thackeray Morcha
राज ठाकरे यांनी 6 जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. “हिंदीची सक्ती म्हणजे मराठीपणावर घाला असून, यामध्ये पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मराठी माणसांनी एकत्र यावे,” असे राज यांनी ठणकावून सांगितले. या मोर्चामध्ये कोणताही पक्षीय झेंडा नसेल, पण ‘मराठी’चा अजेंडा सर्वांत ठळक असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी देखील या मुद्द्यावर आक्रमक होत 7 जुलै रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. त्याआधी हुतात्मा स्मारकावर अभिवादन करून मोर्चा मैदानात दाखल होणार आहे. “ही केवळ सुरुवात आहे, हिंदी सक्ती मागे न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवू,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
या दोघांनीही स्पष्टपणे सरकारवर टीका करत, “त्रिभाषा सूत्र राज्यावर लादू नये” अशी भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधत म्हटले की, “बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता बांटेंगे और काटेंगे या धोरणावर चालले आहेत.”



