
Bharat Gogawale on Sunil Tatkare : ‘तटकरेंनी फसवलं’ या आरोपाला तिखट उत्तर; निवडणुकीपूर्वीच शिंदेसेना आणि राष्ट्रवादीत मोठा राजकीय भडका
रायगड :- रायगड जिल्ह्यातील महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा आणि आरोप-प्रत्यारोपांचा भडका आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उडाला आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू आहेत.
‘डोक्यावर पडलेले आमदार’ असा पलटवार: काही दिवसांपूर्वी आमदार महेंद्र दळवी यांनी, “लोकसभा निवडणुकीत आम्ही मतभेद बाजूला ठेवून सुनील तटकरेंना दिल्लीला पाठवलं, पण त्यांनी आम्हाला फसवलं,” असा थेट हल्लाबोल केला होता. या टीकेला राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी अत्यंत तिखट भाषेत उत्तर दिले आहे.
अनिकेत तटकरे म्हणाले
“शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी हे डोक्यावर पडलेले आमदार आहेत. याशिवाय ते स्वतःला चिटर आमदार (फसवणारे आमदार) असं म्हणणारे असून दुसऱ्यालाही त्याच नजरेने पाहतात.”
दळवी यांनी केलेल्या ‘पार्थ पवार आणि धनंजय मुंडे यांचा घात राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी केला’ या टीकेलाही अनिकेत तटकरे यांनी प्रत्त्युत्तर दिले.
शिंदेंकडे दळवींच्या ‘बेताल’ वक्तव्यांची तक्रार
अनिकेत तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर कठोर टीका करताना म्हटले की, आमदार दळवी हे आमच्या नेत्यांवर बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांच्या या वक्तव्याला आवर घालण्यासाठी आम्ही त्यांचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार आहोत. ते स्वतःला मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे समजत आहेत, आता त्यांना आवरण्याची गरज आहे, असेही तटकरे यांनी म्हटले.
महेंद्र दळवींचा पुन्हा पलटवार
या टीकेला उत्तर देताना आमदार महेंद्र दळवी यांनीही लगेच पलटवार केला आहे. त्यांनी म्हटले:
“घोडा मैदान आता जास्त लांब नाही, त्यामुळे येथे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.”
तसेच त्यांनी तटकरेंना उद्देशून टोला लगावला, “मुख्यालयात आमदार असणाऱ्यांना त्यांच्याच होम ग्राउंडवर उमेदवार सापडत नाहीत, त्यांनी आम्हाला आवाहन देऊ नये.”
रोह्यात राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी काल शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर अनिकेत तटकरे यांनी आमदार दळवी यांना टोला लगावला आणि आगामी निवडणुकीत सर्व जागा आम्ही जिंकू, असा दावा केला. एकूणच, रायगडमधील महायुतीचे हे अंतर्गत युद्ध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणते वळण घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


