महाराष्ट्र

Raigad News : उरणजवळ गुजरातची मासेमारी बोट बुडाली; 7 खलाशांना वाचवण्यात यश

•समुद्राला आलेल्या उधाणाने झाला घात, हेलिकॉप्टरच्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य

रायगड :- मुंबईसह कोकण किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील उरणजवळ एक मासेमारी बोट समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. ही बोट गुजरातच्या मच्छिमारांची असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने, या बोटीवर असलेले सातही खलाशी सुरक्षित असून, त्यांना बचाव पथकाने यशस्वीपणे बाहेर काढले आहे.

ही दुर्घटना उरण भागात घडली. समुद्राला आलेल्या उधाणामुळे बोटीत पाणी शिरले आणि ती बुडाली. या बोटीत एकूण सात खलाशी होते. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. युद्धपातळीवर चालवण्यात आलेल्या या बचावकार्यात हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. बचाव पथकांनी सर्व सात खलाशांना सुखरूप बाहेर काढले.

या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दुर्घटनाग्रस्त बोट समुद्राच्या लाटांवर हेलकावे खाताना दिसत आहे. काही बचावकर्ते लाईफ जॅकेट घालून बोटीतील मच्छिमारांना वाचवताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी अलिबागमध्येही अशीच एक बोट दुर्घटना घडली होती, ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर सहा जणांना वाचवण्यात यश आले होते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारांना समुद्रात जाण्यास सक्त मनाई आहे. तरीही काही मच्छिमार या आदेशाकडे दुर्लक्ष करून मासेमारीसाठी जातात, ज्यामुळे अशा दुर्घटना घडतात, असे म्हटले जात आहे.

vivek

Recent Posts