Rahul Kul : बिबट्याच्या बंदोबस्तासाठी टास्क फोर्स तयार करून आवश्यक ठिकाणी पिंजरे लावा ; आ. राहुल कुल

[ सकारात्मक कार्यवाहीचे मुख्यमंत्री यांचे आश्वासन ]
दौंड, ता. ९ संपूर्ण पुणे जिल्ह्यात तसेच दौंड तालुक्यातील अनेक गावामंध्ये मानवीवस्तीत बिबट्या व तत्सम जंगली प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, मागील ६ महिन्याच्या कालवधीत पाळीव प्राणी व मनुष्यावर देखील बिबट्याने मोठ्या प्रमाणवर हल्ले केले आहेत. पूर्वी फक्त जंगलात आढळणारे हे प्राणी आता शेतकऱ्यांच्या शेतात तसेच मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणावर शिरकाव करू लागले आहेत. सद्यस्थितीत ग्रामीण भागात ऊसतोडणी चालू असून त्यामुळे बिबट्याला वास्तव्यास जागा राहत नसल्याने त्यांचा मुक्त संचार सुरु झाला असून, काही ठिकाणी रस्त्यावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू देखील झालेला आहे. हे बिबटे नरभक्षक बनले असून, पाळीव प्राणी व नागरिकांवरील वाढते हल्ले यामुळे होणारे नुकसान लक्षात घेता बिबट्याला पकडण्यासाठी टास्क फोर्स तयार करणे व आवश्यक ठिकाणी तातडीने पिंजरे लावणे आवश्यक आहे.

पुणे जिल्ह्यात व दौंड तालुक्यात बिबट्याचा मानवीवस्तीत वाढलेला वावर थांबविण्यासाठी व बिबट्या व तत्सम जंगली प्राण्यांना पकडण्यासाठी टास्क फोर्स तयार करणे व आवश्यक ठिकाणी पिंजरे लावणेबाबतची मागणी आमदार राहुल कुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे केली व याबाबत भेट घेऊन निवेदन देखील दिले. दौंड तालुक्यातील कानगाव, कडेठाण आणि मांडवगण फराटा या ठिकाणी तीन जीव गेले आहेत. संबंधित कुटुंबाला किती प्रशासकीय मदत मिळाली तरी ही हानी भरून येणार नाही, असेही कुल म्हणाले. Rahul Kul याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले.