
Rahul Gandhi On BJP : महाराष्ट्रात 1 कोटी बनावट मतदार, निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह
ANI :- बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत राहुल यांनी मतदानातील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर ‘व्होट चोरी’चा आरोप केला. आधी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) नसतानाही एका दिवसात निवडणुका होत असत, मात्र आता तसे होत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले, “लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागतो, पण भाजपला मात्र त्याचा कधीच प्रभाव जाणवत नाही. असे घडणारा तो एकमेव पक्ष आहे.” ते पुढे म्हणाले, “आधी EVM नसतानाही संपूर्ण देशात एकाच दिवशी मतदान होत असे, पण आता अनेक महिने मतदान चालते. वेगवेगळ्या दिवशी मतदान का केले जाते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल काही वेगळेच दर्शवत होते, पण अचानक निकाल पूर्णपणे भिन्न लागला. यामध्ये मोठी तफावत दिसून आली आहे. आमचे सर्वेक्षणही मजबूत असते, पण त्याचा निकालही अपेक्षित नसतो, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील निवडणुकांवरही राहुल यांनी संशय व्यक्त केला. “महाराष्ट्रामध्ये पाच महिन्यांत खूप मोठ्या संख्येने नवीन मतदार जोडले गेले, जी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत खूप जास्त आहे. यामुळे आम्हाला संशय आला. विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला, पण लोकसभा निवडणुकीत आम्ही जिंकलो. 1 कोटी नवीन मतदार अचानक कुठून आले? आम्ही निवडणूक आयोगाकडे मतदार यादी मागितली, पण त्यांनी ती दिली नाही,” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.



