Uddhav Thackeray Marathwada Tour : उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून मराठवाडा दौऱ्यावर; शेतकऱ्यांशी साधणार थेट संवाद

Uddhav Thackeray Marathwada Tour : दिवाळीपूर्वी दिलेले आश्वासन पाळले का?’; खरडून गेलेल्या जमिनीसाठी माती आणि मदतीचा घेणार आढावा
मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. ते येत्या 5 तारखेपासून (नोव्हेंबर) मराठवाड्यात संवाद दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या दौऱ्यात ते थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना जाहीर केलेली मदत मिळाली की नाही, याचा आढावा घेणार आहेत.


माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील संवाद दौऱ्याची योजना मांडली. ते म्हणाले, “दिवाळीपर्यंत, दिवाळीच्या आत काही पैसे शेतकऱ्याला मिळतील असं पोकळ आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. काही हजार कोटी तिजोरीतून रिलीज केले असं ते म्हणतात, तर ते पैसे मिळाले का याबद्दल विचारणार आहे.” आपला दौरा नुसती आगपाखड करायला किंवा टीका करायला म्हणून नसेल, पण शेतकऱ्याला मदत मिळालीच पाहिजे, ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे, त्यांना जमीन पूर्ववत करण्यासाठी सर्वात आधी मातीची गरज आहे. ती मातीच जर त्यांना मिळाली नसेल तर पुढच्या गोष्टी कशा होणार, असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांची दर हेक्टरी 50 हजार रुपये मदत आणि कर्जमुक्ती झालीच पाहिजे, ही मागणी कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
खरडून गेलेल्या जमीनीला मनरेगातून तीन-साडेतीन लाख रुपये देणार होते. त्यापैकी दिवाळीपूर्वी 1 लाख रुपये तरी शेतकऱ्याच्या खात्यात टाका, अशी मागणी आम्ही मोर्चादरम्यान केली होती, पण तेही पैसे दिलेत असं वाटत नाही, असे ते म्हणाले. “आम्ही शेतकऱ्यांशी प्रामाणिकपणे वागलो, तसं हे सरकार का वागत नाही?” असा सवाल त्यांनी करत सरकारच्या धोरणांवर टीका केली. ते मराठवाडा दौऱ्यात घोषित झालेल्या पॅकेजपैकी शेतकऱ्याच्या हातात काय मिळाले, हे पाहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


