Sangli Political News : ‘दम असेल तर रणांगणात या’; जयंत पाटलांवरील टीकेवरून रोहित पवार आणि निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांवर हल्लाबोल

•सांगलीत ‘संस्कृती बचाव मोर्चा’, गोपीचंद पडळकर म्हणजे ‘बेन्टेक्सचे सोने’ – रोहित पवारांची टीका
सांगली :- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे निर्माण झालेल्या वादाचे पडसाद आज सांगलीमध्ये तीव्रतेने उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या ‘संस्कृती बचाव मोर्चा’ च्या सभेत खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
खासदार निलेश लंकेंचे आव्हान
खासदार निलेश लंके यांनी भाषणाची सुरुवातच आक्रमकपणे केली. गोपीचंद पडळकर यांच्यावर थेट टीका करताना ते म्हणाले, “यांचा आका एसीत बसतो, त्या आकालाच धडा शिकवायला हवा. एकदा पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या.” सरकारकडे विकासाचा कोणताही अजेंडा नसल्यामुळे अशा गोष्टी पुढे केल्या जातात, असे ते म्हणाले. ‘वाचाळवीर आधी दोन पोलीस घेऊन फिरत होते, आता चार पोलीस घेऊन फिरत आहेत. दम असेल तर पोलीस बाजूला ठेवून मैदानात या. दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या,’ असे आव्हान त्यांनी दिले.
‘पडळकर म्हणजे बेन्टेक्सचे सोने’
आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांची तुलना ‘बेन्टेक्सच्या सोन्याशी’ केली. “हा विषय केवळ तालुका किंवा जिल्ह्याचा नाही, तर तो महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्माचा आहे,” असे ते म्हणाले. राष्ट्रवादी खालच्या पातळीवर जाऊन बोलू शकते, पण आम्ही शब्दांची पातळी जपतो, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी आणल्याचा आरोप करत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला.
‘यांचा बोलवता धनी कोण?’
रोहित पवारांनी भाषणात विचारसरणीचा मुद्दा मांडला. “महाराष्ट्रातील महामानवांनी आम्हाला विचार दिला. आपण त्यांच्या जयंती साजरी करतो, पण त्यांच्या विचारांचे अनुकरण करत नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. बहुजन समाजाच्या नेत्यांचा वापर पवार कुटुंब आणि इतर मोठ्या नेत्यांवर टीका करण्यासाठी केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. ‘या लोकांना बोलून उपयोग नाही, यांचा बोलवता धनी कोण? त्यांना बोलले पाहिजे,’ असे म्हणत त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. निवडणुकीच्या काळात भाजप समाजात तेढ निर्माण करते, असा आरोपही त्यांनी केला.


