
Mumbai Local Train : अंधेरी सबवे, वेस्टर्न एक्सप्रेस वे सुरू; काही ठिकाणी अजूनही पाणी साचलेले
मुंबई :- गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू होता. आज पावसाने थोडी विश्रांती घेतली असून, मुंबई उपनगरात सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र, सततच्या पावसामुळे आजही मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
लोकल सेवांवर परिणाम
मध्य रेल्वे आजही मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहेत. यामुळे कल्याण स्थानकावर प्रचंड गर्दी झाली असून, प्रवासी आणि चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हार्बर रेल्वे: सीएसएमटीहून पनवेलला जाणाऱ्या गाड्या 8 ते 10 मिनिटे उशिराने, तर पनवेलहून येणाऱ्या गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. ठाणे ते वाशी मार्गावरील लोकलही सात ते आठ मिनिटे उशिराने धावत आहेत.
पश्चिम रेल्वे या मार्गावर वाहतूक सुरळीत असली तरी विरार ते चर्चगेट लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत, तर बोरिवली ते चर्चगेट लोकल 5 मिनिटे उशिराने धावत आहेत.
रस्ते वाहतूक आणि पाणी साचलेले भाग
आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्याने मुंबई उपनगरात कुठेही पाणी साचलेले नाही. अंधेरी सबवे आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग सुरू आहेत. मात्र, जुहूतील वीर देसाई रोडवर अजूनही पाणी साचलेले असल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’ कायम
पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी, हवामान विभागाने आजही मुंबईसह उपनगरात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.



