
Pratap Sarnaik On Mira Bhayandar CP : मीरा-भाईंदरच्या विकासकामांच्या आढावा बैठकीत वरिष्ठ पोलीस अधिकारी अनुपस्थित, मंत्र्यांनी विचारले स्पष्टीकरण; कॅबिनेटमध्येही जाब विचारणार असल्याचा इशारा
मीरा-भाईंदर :- मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी विकासकामांच्या आढावा बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक चांगलेच संतापले आहेत. त्यांनी या संदर्भात थेट राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
सोमवारी मीरा-भाईंदर महापालिका मुख्यालयात शहराच्या
विकासकामांचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी महापालिका, एमआरडीए, प्रादेशिक परिवहन, वन विभाग आणि पोलीस प्रशासनासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. Mira Bhayandar Latest News
परंतु, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातून केवळ वाहतूक विभागाचे उपायुक्तच बैठकीला हजर होते. त्यामुळे विकासकामांशी संबंधित कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलिसांची भूमिका मांडता आली नाही.
या गंभीर गैरहजेरीची दखल घेत मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले. त्यावेळी, बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पोलीस विभागाला पत्र पाठवूनही ते आले नसल्याचे उघड झाले. यामुळे संतप्त झालेल्या सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात मुख्य सचिवांकडे तक्रार करण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे, तर या प्रकरणी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या अधिकाऱ्यांकडून जाब विचारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या गैरहजेरीमुळे शहराच्या विकासकामांना खीळ बसू शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.


