
Prakash Mahajan On MNS : “मनसे हिंदुत्वापासून दूर गेली” म्हणत राज ठाकरेंवर टीका; ‘कमळा’कडे गेलेल्या वैभव खेडेकरांवर कौतुक; “आता भाजपानं ठरवावं,” महाजनांचा सूचक इशारा
नागपूर :- राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Winter Session Nagpur 2025) चौथ्या दिवशी नागपुरात मोठी राजकीय चर्चा रंगली. मनसेचे माजी ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी मनसेतून नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या वैभव खेडेकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘रामगिरी’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी प्रकाश महाजन यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या संभाव्य निर्णयावर सूचक विधान केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत विचारले असता प्रकाश महाजन म्हणाले की, हे वैयक्तिक काम असून मुख्यमंत्र्यांसोबत आमचे पारिवारिक संबंध आहेत. त्यांनी यावेळी वैभव खेडेकर यांचे तोंडभरून कौतुक केले. “भाजपामध्ये वैभव खेडेकर खूप आनंदी आहे. माझ्या पाल्याचा आनंद पाहायला आलो आहे. वैभव खेडेकर कमळाकडे गेला, त्यामुळे मी खूश आहे,” असे ते म्हणाले.
याचवेळी त्यांनी भाजपप्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केले. “भाजपाचा पराभव झाल्यावर आम्हाला वाईट वाटतं, नातं जुनं आहे. मी कधीच भाजपाविरोधात काम केलेलं नाही. आता भाजपानं ठरवायचं आहे,” असे विधान करून त्यांनी आपल्या राजकीय भविष्याबाबत उत्सुकता निर्माण केली.
राज ठाकरेंवर टीका
मनसे सोडण्यामागचे कारण स्पष्ट करताना प्रकाश महाजन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. “मनसे हिंदुत्वापासून दूर जाते आहे. त्यांनी हिंदुत्वाच्या प्रश्नावर माघार घेतली. मनसेतून बाहेर पडण्यामागे हेच कारण आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच, “मी राज ठाकरेंना घाबरत नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे, शाखेत देखील जातो,” असे स्पष्ट करत त्यांनी, संघाच्या गणवेशातील फोटो पोस्ट केल्यावरून अभिनेता रमेश परदेशी (पिट्या भाई) यांचा राज ठाकरेंनी केलेल्या पाणउताऱ्याबद्दलही टीका केली.


