क्राईम न्यूज
Trending

PM Modi : “मी कधीही पूर्णपणे संतुष्ट होत नाही”; पंतप्रधान मोदींचा ‘रिफॉर्म एक्सप्रेस’वरून प्रगतीचा मंत्र

PM Modi Latest News : सुधारणा ही सतत चालणारी प्रक्रिया; 38 देशांसोबतचे व्यापार करार हे भारताच्या वाढत्या जागतिक ताकदीचे प्रतीक – पंतप्रधानांचे प्रतिपादन

नवी दिल्ली,PTI | पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांनी पीटीआयला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत आपल्या कार्यपद्धतीचा आणि देशाच्या भविष्याचा मूळ मंत्र स्पष्ट केला आहे. “माझ्या स्वभावानुसार मी कधीही पूर्णपणे संतुष्ट होत नाही,” असे सांगत पंतप्रधानांनी देशाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहण्याचा आपला निर्धार व्यक्त केला. सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तीमध्ये ‘सकारात्मक अस्वस्थता’ असणे आवश्यक आहे, कारण हीच अस्वस्थता तुम्हाला जनतेसाठी आणि देशासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देते, असे मार्मिक भाष्य त्यांनी यावेळी केले.

देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणांच्या वेगावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की, सुधारणा ही कधीही न थांबणारी प्रक्रिया आहे. आतापर्यंत झालेल्या प्रगतीकडे आणि विकासकामांकडे डोळेझाक करता येणार नाही, मात्र केवळ छोट्या बदलांवर समाधान न मानता व्यवस्थेमध्ये मोठे आणि पायाभूत बदल करण्यावर त्यांच्या सरकारचा भर आहे. देश आता सुधारणांच्या माध्यमातून नव्या दिशेने पुढे जात असून, सतत सुधारणांचा विचार करणे आणि पुढे जाणे हाच आपला मूळ स्वभाव असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी यावेळी भारताच्या वाढत्या जागतिक शक्तीचे उदाहरण देताना मुक्त व्यापार करारांचा (FTA) उल्लेख केला. गेल्या काही वर्षांत भारताने तब्बल 38 देशांसोबत व्यापार करार करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. युपीए सरकारच्या काळात अशा करारांवर केवळ प्रदीर्घ चर्चा व्हायच्या, पण त्यातून कोणताही ठोस परिणाम हाती येत नसे. मात्र, आजच्या भारताची अर्थव्यवस्था मजबूत असून धोरणात्मक स्थिरता आणि स्पष्ट हेतू यामुळे जगाचा भारतावरचा विश्वास वाढला आहे. युरोपियन युनियनसोबत झालेला ऐतिहासिक करार हे भारताच्या वाढत्या आत्मविश्वासाचेच फळ आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारताचा उदय आता जगाचा एक ‘विश्वासू भागीदार’ म्हणून झाला असून भारतीय कंपन्या मोठ्या जागतिक बाजारपेठा काबीज करत आहेत. धोरणात्मक सुधारणांमुळे झालेली गुंतवणुकीतील वाढ आणि राजकीय स्थिरता यामुळेच भारताची जागतिक भागीदारी वेगाने वाढल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ही ‘रिफॉर्म एक्सप्रेस’ अशीच धावत राहील आणि देशाला नव्या उंचीवर नेईल, असा विश्वास त्यांनी या मुलाखतीतून व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0