Maharashtra Weather Update : पुन्हा एकदा राज्यात पावसाचा हाहाकार; मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ‘मुसळधार ते अतिमुसळधार’चा इशारा

•पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम; शेतीच्या नुकसानीत भर पडण्याची भीती
मुंबई :- मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात नुकताच पावसाचा मोठा फटका बसलेला असतानाच, हवामान विभागाने (IMD) आजपासून संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आजपासून सुरू होणारी या पावसाची तीव्रता पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याने प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कुठे आणि कधी पडणार पाऊस?
आजपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार असला तरी, अनेक भागांत यामुळे शेतीच्या नुकसानीत आणखी भर पडण्याची भीती आहे.
आज (शुक्रवार): मुंबई, ठाणे, पालघर या भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
शनिवार व रविवार: मुंबई आणि ठाणे भागांत अतिमुसळधार पावसाचा (Orange Alert) इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत अनेक ठिकाणी कमी वेळेत जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.
इतर भागातील अंदाज:
मेघगर्जनेसह पाऊस: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट परिसर, नाशिक घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्या नगर, जालना, बीड आणि परभणी.
मुसळधार पाऊस: कोल्हापूर, सोलापूर, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ.
पावसाच्या तीव्रतेचे कारण
बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र या तीव्र पावसाचे मुख्य कारण आहे. हे क्षेत्र पश्चिम-वायव्येकडे सरकण्याची शक्यता असून, त्यानंतर ते डिप्रेशनमध्ये (Depression) केंद्रित होऊन दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनाऱ्यांवरून पुढे सरकण्याची शक्यता आहे. तसेच, कर्नाटक ओलांडून दक्षिण महाराष्ट्र किनाऱ्यापर्यंत असलेली ट्रफ रेषा देखील पावसासाठी पोषक वातावरण निर्माण करत आहे.


