
Palghar Kashinath Chaudhary : वाढत्या विरोधामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा तातडीने निर्णय; ‘संवेदनशीलतेमुळे’ प्रवेश रोखला
मुंबई :- पालघर जिल्ह्याच्या Palghar Politics राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेले काशिनाथ चौधरी Palghar Kashinath Chaudhary यांच्या पक्षप्रवेशाला भाजप प्रदेश कार्यालयाने तातडीने स्थगिती दिली आहे. गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणातील त्यांची कथित भूमिका आणि त्यानंतर विरोधकांनी केलेल्या तीव्र टीकेच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा निर्णय घेतला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघर भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पत्र लिहून काशिनाथ चौधरी यांचा पक्षप्रवेश तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
विरोधामुळे पक्षश्रेष्ठींचा निर्णय
काशिनाथ चौधरी यांनी 16 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून मोठ्या जाहीर सभेद्वारे भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, पालघर साधू हत्याकांडाच्या वेळी भाजपनेच त्यांच्यावर मुख्य सूत्रधार म्हणून गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांचा प्रवेश होताच विरोधकांनी राज्यभरातून भाजपवर टीकेची झोड उठवली होती.वाढता विरोध आणि प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन भाजप पक्षश्रेष्ठीने हा निर्णय घेतला आहे.
भाजपची भूमिका
भाजप नेते आणि प्रवक्ते नवनाथ बन यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. “पालघर साधू हत्याकांड प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन, स्थानिक पातळीवर झालेल्या काशिनाथ चौधरी यांच्या प्रवेशाच्या निर्णयाला प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी तात्काळ स्थगिती दिली आहे,” असे त्यांनी सांगितले.
तसेच, अधिकृत नोंदींनुसार कोणत्याही एफआयआर (FIR) किंवा चार्जशीटमध्ये त्यांचे नाव नसले तरी, विषयाचा गांभीर्याने विचार करून ही स्थगिती देण्यात येत असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.काशिनाथ चौधरी यांच्या या स्थगितीमुळे पालघरमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.



