मुंबई

Mumbai Weather Update : वसई-विरारमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; नालासोपारा जलमय

•भात कापणी सुरू असतानाच पाऊस कोसळल्याने बळीराजा संकटात; रविवारपर्यंत पावसाचा अंदाज

वसई-विरार :- वसई-विरार शहराला मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसू लागला आहे. शनिवार, 25 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास शहरात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही मिनिटे कोसळलेल्या पावसामुळे नालासोपारा परिसरातील रस्ते जलमय झाले असून, नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

ऑक्टोबरमध्येही पावसाची हजेरी

ऑक्टोबर महिना संपत आला असला तरी वसई-विरार शहरात अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच आहे. दिवाळी संपल्यानंतरही शहरात पावसाचा जोर कायम आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

शनिवारी दुपारी वसई-विरारच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. काही भागात रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.

नागरिकांची गैरसोय

या अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः नालासोपारा परिसरातील गाला नगरसह विविध ठिकाणी अवघ्या काही मिनिटांत पाणी साचून रस्ते जलमय झाले. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाने तात्पुरता दिलासा दिला असला, तरी धुळीने भरलेले रस्ते आता चिखलमय झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

बळीराजा संकटात

वसई-विरारच्या ग्रामीण भागात भात पिके कापणीसाठी तयार झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी भात कापणी सुरू केली असतानाच या अवकाळी पावसात कापणी केलेले भात भिजून गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पावसाचे सत्र असेच सुरू राहिल्यास हातातोंडाशी आलेला भाताचा घास निसटून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0