Sanjay Raut : “ठाकरे बंधूंच्या मोर्चाचा धसका घेतला, म्हणूनच निर्णय मागे!” – संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

Sanjay Raut News : “फडणवीस-शिंदे एकत्र येऊ शकतात, मग ठाकरे बंधू एकत्र आले तर एवढा त्रास का?”; खासदार संजय राऊत
मुंबई : हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतरही राजकारण पेटतच आहे. महायुती सरकारच्या ‘यू-टर्न’वर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी रविवारी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चाचा धसका सरकारने घेतला, त्यामुळेच हिंदीच्या दोन्ही निर्णयांना मागे घ्यावं लागलं,” असा आरोप त्यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, “सरकारने गोंधळ घालायचा प्रयत्न केला. वेगवेगळे तोडगे आणले. पण शेवटी जनता रस्त्यावर उतरली आणि सरकारी अध्यादेशाची होळी केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी बांधव 5 जुलैच्या मोर्चासाठी सज्ज झाले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्णय मागे घेतला.”
“आता फालतू समिती नको”
त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या नरेंद्र जाधव समितीवरही राऊतांनी नाराजी व्यक्त केली. “आता ही फालतू समिती नको. आम्ही त्रिभाषा सूत्र स्वीकारणारच नाही, महाराष्ट्रही मान्य करणार नाही,” असे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही याबाबत स्पष्ट भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले.
मोर्चा आता ‘विजयी मेळावा’ बनणार
संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरे यांच्याशी काल माझी चर्चा झाली. दोघांचे एकत्र येणे हे महाराष्ट्रासाठी शक्ती प्रदर्शन होते. आता 5 तारखेचा मोर्चा ‘विजयी मेळावा’ म्हणून साजरा केला जाणार आहे.” या मेळाव्यात उद्धव आणि राज यांच्यासह इतर घटक पक्षही सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन भाऊ एकत्र आले तर पोटात का दुखतं?”
राऊतांनी भाजपवर बोचरी टीका करत म्हटलं, “फडणवीस आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात, फडणवीस आणि शिंदेही एकत्र येऊ शकतात, मग ठाकरे बंधू एकत्र आले तर एवढा त्रास का होतो? आम्ही सकारात्मक म्हणूनच एकत्र आलो.”
“माशेलकर अहवालावरून दिशाभूल”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेचा निर्णय माशेलकर समितीने आणि त्यानुसार उद्धव ठाकरे सरकारने घेतला होता, असं वक्तव्य केलं होतं. यावर राऊत म्हणाले, “ते खोटं बोलत आहेत. जर त्या अहवालावर विश्वास आहे, तर तो टेबलवर आणा. आणि तरी नरेंद्र जाधव समिती का?”
“आम्हाला भूतकाळात जाऊ देऊ नका”
शेवटी राऊत म्हणाले, “फडणवीस अजित पवारांना तुरुंगात घालायला निघाले होते. मोदी प्रफुल्ल पटेल यांना दाऊदचा हस्तक म्हणायचे. मग आज सगळे एकत्र येतात. आम्हालाही मग भूतकाळात डोकावू देऊ नका!”


