
Nitesh Rane On Nashik : राणे म्हणतात, ‘एका धर्माला एक न्याय कशाला?’; ठाकरे गटाचा हल्लाबोल, ‘टिल्लू-लेव्हल बुद्धीत वृक्षतोडसारखा विषय बसणार नाही’
नाशिक :- नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवन परिसरात 1800 झाडांची तोड प्रस्तावित असल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी याला तीव्र विरोध दर्शवला असतानाच, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे Nitesh Rane यांनी या वादाला धार्मिक वळण देणारे अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे, ज्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राणे यांचा ‘बकरी ईद’चा सवाल
कुंभमेळ्यासाठी साधूग्राम उभारण्याच्या या कामात वृक्षतोडीवर होणाऱ्या विरोधाबद्दल बोलताना नितेश राणे यांनी थेट धर्म आणि पर्यावरणाची तुलना केली. राणे यांनी म्हटले की, तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे तथाकथित पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी होणाऱ्या बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा हे सर्व गप्प का? ‘सर्व धर्म सम भाव’ कुठे जातो? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. “जसं झाडाला मिठी मारतात, तसं बकरीला का मिठी मारत नाही?” असा प्रश्न विचारून त्यांनी एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा कशाला, असा रोखठोक मुद्दा मांडला.
ठाकरे गटाचा सडेतोड प्रत्युत्तर
नितेश राणे यांच्या या वादग्रस्त विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत टीकास्त्र सोडले. चित्रे यांनी म्हटले की, वृक्षतोड हा पर्यावरणाचा गंभीर विषय आहे, तो धर्माचा नाही. ‘टिल्लू-स्तराची बुद्धी’ असलेल्या व्यक्तीला वृक्षतोडसारखा गंभीर विषय कुठून समजणार? “त्याच्या सिस्टीममध्ये तर हिंदू-मुस्लीम, बकरा-कोंबडीच फिरतात, वृक्षतोडची फाईल तर ‘अनसपोर्टेड फॉर्मेट’ म्हणूनच उघडत नाही,” अशा बोचऱ्या शब्दांत चित्रे यांनी नितेश राणेंच्या बुद्धिमत्तेवर टीका केली.


