
Nitesh Rane On Thackeray : “उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्री राम!” मुंबईत भाजप ९९ जागांसह नंबर १; विजयानंतर नितेश राणेंची ठाकरे कुटुंबीयांवर जहरी टीका!
मुंबई l महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल आज स्पष्ट झाले असून, राज्याच्या राजकारणात भाजपने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. २९ पैकी तब्बल २६ महापालिकांमध्ये भाजप महायुतीने मुसंडी मारत विजयाचा गुलाल उधळला आहे. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीत भाजपने ९९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली आहे. या विजयानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी आणि खोचक टीका केली आहे.
मुंबईत भाजपची मुसंडी; ठाकरे गटाला धक्का
मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या या अत्यंत चुरशीच्या रणसंग्रामात कोणत्याही एका पक्षाला ११४ या बहुमताच्या आकड्यापर्यंत स्वबळावर पोहोचता आलेले नाही. मात्र, भाजपने ९९ जागा जिंकून मुंबईत ‘नंबर १’ चा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, गेल्या अनेक दशकांपासून मुंबईवर सत्ता गाजवणाऱ्या ठाकरे गटाला केवळ ६३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालांमुळे मुंबईतील सत्तेच्या चाव्या आता कोणाकडे जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नितेश राणेंचा व्हिडीओ आणि ‘इस्लामाबाद’चा टोला
निकालाचे कल स्पष्ट होताच नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक २२ सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते जोरजोरात हसताना दिसत आहेत. “उद्धवजी आणि पेंग्विनला… जय श्री राम!” असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना डिवचले आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे अधिक आक्रमक झाले. ते म्हणाले, “आज जो भगवा झंझावात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळाला, त्याने सर्व महापालिकांत आमचा महापौर बसण्याची तयारी झाली आहे. हा विजय म्हणजे महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या जिहादींना मिळालेला कडक संदेश आहे.”


