
Nepal Latest News : संसद आणि राष्ट्रपती भवनानंतर आता थेट मंत्र्यांच्या घरांवर हल्ले, हिंसाचारात 25 आंदोलकांचा मृत्यू
ANI :- नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी आणल्यानंतर Gen-Z (तरुणाईने) आक्रमक पवित्रा घेतला असून, देशात मोठा हिंसाचार उफाळला आहे. तरुणाईने थेट संसद आणि राष्ट्रपती भवनानंतर आता नेपाळचे कायदेमंत्री अजय कुमार चौरसिया यांचे घरच पेटवून दिले. या हिंसाचारात आतापर्यंत 25 हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे, तर सरकारच्या धोरणांवर नाराज होऊन 9 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.
सरकारविरोधात मंत्र्यांचाही निषेध
राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांमध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य आणि माहिती प्रसारण मंत्र्यांचा समावेश आहे. ‘नागरिकांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही आणि लोकशाहीवर निर्बंध लादता येत नाहीत,’ असे म्हणत या मंत्र्यांनी तरुणांच्या भूमिकेला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. नेपाळमधील के पी ओली सरकारसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
काय आहे सोशल मीडिया बंदीचा वाद?
नेपाळ सरकारने संसदेत एक नवीन विधेयक आणले आहे, ज्यानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना स्थानिक प्रतिनिधी नेमणे, नोंदणी करणे आणि कठोर नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, नेपाळच्या तरुणाईला हा नियम अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेला मोठा निर्बंध वाटत आहे. त्यांनी याला ‘डिजिटल सेन्सॉरशिप’ असे म्हटले आहे.
फेसबुक, इंस्टाग्रामसह 26 ॲप्सवर बंदी; ‘सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा’ आरोप
या बंदीमध्ये फेसबुक, मेसेंजर, इन्स्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सॲप, एक्स (ट्विटर), लिंक्डइन, स्नॅपचॅट, आणि व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) यासह तब्बल 26 लोकप्रिय ॲप्सचा समावेश आहे. या बंदीमुळे नेपाळच्या युवकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे, ज्यामुळे भविष्यात आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या अभूतपूर्व घटनेने नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणखी वाढली आहे.


