Navnet Rana : “हिंदूंनी किमान 3 ते 4 मुलं जन्माला घालावीत!”; नवनीत राणांचे लोकसंख्यावाढीवर वादग्रस्त विधान

Navneet Rana Latest News : मौलान्याच्या ’19 मुलं’ असलेल्या वक्तव्याचा दिला दाखला; राजकारण तापले
मुंबई | भाजप नेत्या नवनीत राणा Navneet Rana यांनी लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक आणि वादग्रस्त विधान केले आहे. “एकीकडे मौलाना चार बायका आणि 19 मुलांचे समर्थन करत असतील, तर हिंदूंनीही मागे राहता कामा नये. हिंदूंनी किमान 3 ते 4 मुले जन्माला घातली पाहिजेत,” असे आवाहन नवनीत राणा यांनी केले आहे. मौलाना सय्यद कादरी यांच्या एका विधानाचा दाखला देत राणा यांनी हे भाष्य केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
नेमके प्रकरण काय?
मौलाना सय्यद कादरी यांनी आपल्याला 4 बायका आणि 19 मुले असून, 30-35 मुलांचा ‘कोरम’ पूर्ण न झाल्याची खंत व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या की, “जर ते खुलेपणाने 19 मुलांबद्दल बोलत असतील, तर आपण एका मुलावर का संतुष्ट राहायचे? त्यांचा विचार हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याचा आहे. त्यामुळे आपणही संख्येने वाढले पाहिजे, यामध्ये काही दुमत नाही.”
मशिदीच्या मुद्द्यावरूनही इशारा
मुर्शिदाबाद येथील मशिदीच्या वादावर बोलताना राणा यांनी काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. “बाबरच्या नावाने जर मशीद बांधली गेली, तर कारसेवक तिथे जातील आणि ती तोडण्याचे काम करतील,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. काँग्रेसने नेहमीच समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले असल्याचा आरोपही त्यांनी केला.



