Navi Mumbai News : नेरुळ पोलिसांची जबरदस्त कामगिरी! 83 चोरीचे मोबाईल हस्तगत, मूळ मालकांच्या हाती सोपवले

•12 लाख रुपयांचे मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांत समाधानाची लाट
नवी मुंबई, नेरूळ | नेरुळ पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले आणि चोरीस गेलेले तब्बल 83 मोबाईल फोन गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे हस्तगत करून मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. या मोबाईल्सची एकूण किंमत अंदाजे 12 लाख 10 हजार रुपये असून, विविध राज्यांतून मोबाईल्स शोधून काढण्याची ही पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.



गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीचा वापर, तसेच अत्याधुनिक तांत्रिक तपास कौशल्याचा वापर करून नेरुळ पोलिसांनी देशभरातून विविध ठिकाणी हरवलेले आणि चोरीचे मोबाईल फोन शोधून काढले. या फोनची एकूण किंमत तब्बल 12 लाख 10 हजार रुपये इतकी आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह आयुक्त संजय येणपुरे, उप आयुक्त पंकज डहाणे, आणि सहायक आयुक्त मयुर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यवाहीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, गुन्हे पोलीस निरीक्षक पंकज धाडगे, प्रशासन पोलीस निरीक्षक संजय लाड, पोलीस उपनिरीक्षक मयुर पवार आणि पोलीस हवालदार बाबाजी थोरात यांचा मोलाचा वाटा राहिला.
आज (07 जून) रोजी दुपारी 4 वाजता नेरुळ पोलिसांनी नागरिकांना त्यांच्या मोबाईलचा ‘मोबाईल वापसी’ सोहळ्यात सन्मानपूर्वक परतावा दिला. सहायक आयुक्त मयुर भुजबळ यांच्या हस्ते मोबाईल्स सुपूर्द करण्यात आले. आपल्या हरवलेल्या मोबाईलसह जेव्हा नागरिकांनी पोलीस ठाण्यातून बाहेर पाऊल टाकले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यांत कौतुक होतं!



