
Suresh Mahtre On Navi Mumbai Airport : खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांचा 3 डिसेंबरला लाखोंच्या संख्येने मोर्चा काढण्याचा इशारा
नवी मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले असले, तरी विमानतळाला माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत साधा उल्लेखही न केल्याने रायगड, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमधील स्थानिक भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संतापाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीचे खासदार सुरेश Suresh Mhatre म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी तातडीने भूमिपुत्रांसोबत बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली आहे.
पांच वर्षांपासूनची मागणी; आश्वासनानंतरही उपेक्षा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी गेल्या 2021 पासून सातत्याने होत आहे. यासाठी दि. बा. पाटील सर्वपक्षीय नामकरण समितीने अनेक मोर्चे आणि आंदोलने केली आहेत.
यापूर्वी, नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने 30 सप्टेंबर रोजी अचानकपणे विमानतळाचा परवाना ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ या नावाने जारी केला होता. त्यानंतर भूमिपुत्रांनी आंदोलनाचा इशारा दिला. 6 ऑक्टोबर रोजी नियोजित असलेला ‘लाँग मार्च’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर स्थगित करण्यात आला होता, त्याऐवजी कार रॅली काढण्यात आली होती.
उद्घाटनानंतर संतापाचा उद्रेक
8 ऑक्टोबर रोजी झालेल्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही दि. बा. पाटील यांच्या नावाचा साधा उल्लेखही न केल्यामुळे भूमिपुत्रांची फसगत झाल्याची भावना तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुरेश म्हात्रे यांनी भूमिपुत्रांची बैठक घेतली.
3 डिसेंबरला निर्णायक आंदोलन
या बैठकीनंतर खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने 60 दिवस आंदोलन केले जाणार नाही. मात्र, या 60 दिवसांच्या आत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले गेले नाही, तर 3 डिसेंबर रोजी लाखोंच्या संख्येने भूमिपुत्र आंदोलन करतील. या इशाऱ्यामुळे विमानतळ नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.


