Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनासाठी ठाण्यातून दीडशे बसेस रवाना होणार! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी

Navi Mumbai Airport Opening Ceremony : 8 ऑक्टोबर रोजी उलवे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन; ठाणे शहर भाजप जिल्हाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठका पार पडली
ठाणे :- देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उलवे येथे होणार आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला ठाणे शहरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहतील, यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
दीडशे बसगाड्यांची व्यवस्था
या कार्यक्रमासाठी ठाणे शहरातील 33 प्रभागांमधून सुमारे 150 बसेस कार्यकर्त्यांसह नवी मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना होणार आहेत. भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच या संदर्भात एक बैठक पार पडली, ज्यात सुमारे 400 कार्यकर्ते उपस्थित होते. पक्ष प्रवक्ते सागर भदे यांनी या बसगाड्यांच्या नियोजनाची माहिती दिली.
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री तसेच राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असून, कार्यक्रमासाठी भव्य तयारी सुरू आहे.
कार्यकर्त्यांवर विशेष जबाबदारी
ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी, वागळे, लोकमान्यनगर, वर्तकनगर, ओवळा, ब्रह्मांड, बाळकुम, मानपाडा, राबोडी, वृंदावन, पाचपाखाडी, नौपाडा, कळवा, मुंब्रा, कौसा आणि दिवा अशा 18 मंडळांमधील कार्यकर्त्यांना कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, शक्तिकेंद्रप्रमुख आणि बूथप्रमुख यांनी या तयारीमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी भाजप पदाधिकारी सचिन पाटील, राजेश मडवी, समीर भारती, विक्रम भोईर, तृप्ती पाटील, गौरव सिंग, भास्कर ची बैरी आणि शेट्टी यांचा समावेश असलेली एक विशेष समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.
भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी ठाणेकरांना मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट संबोधन ऐकावे, असे आवाहन केले आहे.



