
Anna Hazare On Nashik Cutting Tree : कुंभमेळ्यासाठी 1,270 झाडांवर कुऱ्हाड; विकासकामांसाठी मंदिरांनाही नोटीस; महंत म्हणतात, “बाबरी तोडून राम मंदिर, इकडे मंदिरांना नोटीस, हे राजकारण नाही.”
नाशिक :- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Nashik Kumbh Mela) पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तपोवन परिसरात तब्बल 1 हजार 270 झाडांवर कुऱ्हाड चालवल्यामुळे नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि विरोधक एकवटले आहेत. 4 नव्या मलनिस्सारण केंद्रांसाठी ही वृक्षतोड सुरू असून, प्रशासन आणि सरकार मात्र आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहे.
अण्णा हजारे यांचा संताप
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या वृक्षतोडीविरोधात तीव्र संताप व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे.अण्णा हजारे म्हणाले, “कुंभमेळासाठी येणारे साधू संत हे जंगलात राहणारे असतात. ते काय झाडावर राहतात का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.राळेगणमध्ये कोणी झाडाची एक फांदी जरी तोडली तरी मला वेदना होतात, असे सांगून त्यांनी स्वार्थी लोकांची संख्या वाढत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली. समाज आणि देशाच्या हितासाठी बलिदान करण्याची तयारी कमी होत चालली असून, ‘आमच्यासारखे काही लोकं आहेत आणि बलिदान करतील’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मंदिरांना नोटीस, साधू महंत आक्रमक
पर्यावरणप्रेमींनंतर आता साधू महंतही या निर्णयाविरोधात आक्रमक झाले आहेत. तपोवन येथील लक्ष्मीनारायण मंदिर, साक्षी गोपाळ मंदिर, शुर्पणखा मंदिर यासह अनेक मंदिरांना मनपा प्रशासनाकडून रस्त्यासह विकास कामांसाठी नोटीस देण्यात आली आहे.
महंत राम स्नेहीदास महाराज यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. “जर मंदिरात नाही राहिले तर कुंभमेळ्यातील साधू महंत राहणार कुठे? एकीकडे बाबरी मशीद तोडून राम मंदिर बनवण्यात आले आणि इकडे मंदिरांना नोटीस, हे राजकारण समजण्यासारखे नाही,” असे ते म्हणाले.आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांसाठी मंदिरांना आलेल्या नोटिसांमुळे साधू-महंतांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, मनपा प्रशासनाकडून आता या नोटिसा चुकून पाठवल्या गेल्याची सारवासारव केली जात आहे.


