नाशिक

Nashik BJP News : नाशिक भाजपमध्ये ‘धक्कातंत्र’! आमदार राहुल ढिकले यांची निवडणूक प्रमुखपदावरून उचलबांगडी; देवयानी फरांदेंवर जबाबदारी

Nashik BJP Latest News : उमेदवारांच्या मुलाखती सुरू असतानाच नेतृत्व बदल; भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर

नाशिक | आगामी नाशिक महानगरपालिका Nashik BJP निवडणुकीसाठी शड्डू ठोकणाऱ्या भारतीय जनता पक्षात ऐन रणांगणात ‘कॅप्टन’ बदलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी आमदार राहुल ढिकले यांना अवघ्या महिनाभरातच निवडणूक प्रमुखपदावरून हटवले असून, त्यांच्या जागी आता नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असतानाच हा आदेश धडकल्याने नाशिक भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. Nashik BJP Latest News

मुलाखतींच्या धामधुमीतच बदल गेल्या रविवारपासून नाशिकमधील 31 प्रभागांसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू आहे. 959 हून अधिक अर्जांची छाननी करण्याचे काम सुरू असतानाच हा बदल करण्यात आला. राहुल ढिकले स्वतः या मुलाखत प्रक्रियेत सक्रीय होते, मात्र अचानक त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

नेतृत्व बदलामागील संभाव्य कारणे

मुलाखतींच्या प्रक्रियेत ‘जुने विरुद्ध नवे’ असा संघर्ष आणि स्थानिक नेत्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळे प्रदेश नेतृत्व नाराज असल्याचे बोलले जाते.काही राजकीय विश्लेषकांच्या मते, ढिकले यांच्या एका वक्तव्यानंतर पक्षात मोठ्या हालचाली झाल्या होत्या, ज्याचे पडसाद या बदलात उमटले असावेत.देवयानी फरांदे यांचा दांडगा जनसंपर्क आणि संघटनात्मक बांधणीचा अनुभव आगामी 15 जानेवारीच्या निवडणुकीत पक्षाला फायदेशीर ठरेल, असा विचार पक्षश्रेष्ठींनी केला असावा.

देवयानी फरांदे यांच्यासमोर आव्हाने नवनियुक्त निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांच्यासमोर आता अत्यंत कमी वेळात उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्याचे आणि महायुतीतील (शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) जागावाटपाचा तिढा सोडवण्याचे मोठे आव्हान आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याने त्यांना आता युद्धपातळीवर काम करावे लागणार आहे.

राहुल ढिकले समर्थकांमध्ये अस्वस्थता नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विधानसभा निवडणूक जिंकली आहे. अशा परिस्थितीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना हटवल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता असून, याचा परिणाम प्रचाराच्या रणनीतीवर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

vivek

Recent Posts