Rohit Pawar : “ती पोकळी कोण आणि कशी भरून काढणार?” अजितदादांच्या आठवणीत रोहित पवारांचे डोळ्यात पाणी आणणारे ट्विट!

•राजकारणाच्या वेगवान घडामोडींमध्ये पुतण्या हळहळला; दादांच्या एक्झिटने महाराष्ट्र अजूनही शोकाकुल!
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात, ‘अजितदादा’ कायमचे शांत झाले आणि अवघ्या राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. 28 जानेवारीच्या त्या दुर्दैवी विमान अपघातानंतर अवघा महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. एकीकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन प्रशासकीय जबाबदारी स्वीकारली असली, तरी वैयक्तिक पातळीवर दादांची उणीव कशी भासते आहे, हे आमदार रोहित पवार यांच्या ताज्या ट्विटमधून समोर आले आहे.
आमदार आणि पुतणे रोहित पवार यांचं ट्विट काय ?
रोहित पवार एक्स (पूर्वीचं) वर गेल्या काही दिवसांपासून पोस्ट्स करत आहेत. अजित पवार यांच्या आठवणीत ते व्याकूळ झालेत. आजही त्यांनी एक भावूक ट्विट केलं असून त्यात एक महत्वाचा प्रश्नही उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांची पोस्ट जशीच्या तशी त्यांच्या शब्दांतं..
राजकारणातील एखादा नेता आपल्यातून निघून जातो पण मागं राहणाऱ्या किती जणांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होतो, त्यांचं किती नुकसान होतं हे गेल्या चार-पाच दिवसांपासून पाहतोय. सध्या अनेक लोकं भेटतायत आणि मा. अजितदादांबाबतच्या त्यांच्या असंख्य आठवणी भाऊक होऊन सांगतात. हे लोकं फक्त राष्ट्रवादी काँग्रस पक्षाशी किंवा राजकारणाशी संबंधित आहेत असं नाही तर सामान्य माणसं आहेत, पण अजितदादांमुळं त्यांच्या जीवनात कसं परिवर्तन झालं, अजितदादांनी त्यांचं कोणतं काम केलं, कशी मदत केली हे सांगत असताना त्यांना अश्रू आवरणं कठीण होतं. हे अनुभवत असताना मा. अजितदादा किती मोठे होते आणि त्यांच्या जाण्याने किती नुकसान झालं, समाजमनावर दुःखाची किती मोठी छाया पसरली, हे दिसतं. म्हणतात ना की, माणूस किती मोठा होता हे समजण्यासाठी आधी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागतो. अजितदादांचं मोठेपण माझ्यासारख्या कुटुंबातल्या व्यक्तीला तर पहिल्यापासूनच माहित होतं, पण त्यापेक्षाही अजितदादा किती मोठे होते हे मलाही आता पुन्हा नव्याने अनुभवायला मिळतंय. अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसं आज पोरकी झालीत आणि त्यांच्या डोक्यावर पुन्हा छत्र धरण्याची खूप अवघड जबाबदारी आमच्यासारख्या नवीन पिढीवर आलीय. ती आम्ही आमच्यापरिने नक्कीच निभावू पण तरीही प्रश्न उरतो की, अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण आणि कशी भरुन काढणार?
असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राजकारणातील एखादा नेता आपल्यातून निघून जातो पण मागं राहणाऱ्या किती जणांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होतो, त्यांचं किती नुकसान होतं हे गेल्या चार-पाच दिवसांपासून पाहतोय. सध्या अनेक लोकं भेटतायत आणि मा. अजितदादांबाबतच्या त्यांच्या असंख्य आठवणी भाऊक होऊन सांगतात.



