Mumbai Serial Bomb Blast : “11 मिनिटांत मुंबई थरथरली होती, पण 19 वर्षांनी सर्व आरोपी निर्दोष ठरले!”

•206 मृत्यू, 800 जखमी… तरी खटल्याचा शेवट ‘निर्दोष मुक्तता’वर
मुंबई | मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भयावह साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी तब्बल 19 वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने धक्कादायक निकाल दिला आहे. 2006 साली घडलेल्या या भीषण स्फोटांमुळे संपूर्ण देश हादरला होता. मात्र आता न्यायालयाने या प्रकरणातील सर्व 11 आरोपींना निर्दोष मुक्त करत गुन्हे अन्वेषण यंत्रणांच्या तपासक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
11 जुलै 2006 रोजी संध्याकाळी अवघ्या 11 मिनिटांत माटुंगा ते मिरारोड दरम्यान सात स्फोट झाले, ज्यात 209 जणांचा मृत्यू झाला आणि 800 हून अधिक जखमी झाले होते. प्रेशर कुकरमध्ये आरडीएक्स, अमोनियम नायट्रेट, खिळे भरून हे स्फोट घडवून आणण्यात आले होते. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सहभाग असल्याचा आरोप होता.
या स्फोटांमुळे ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यांचे लक्तरं उडाले, प्रवाशांचे शरीराचे तुकडे झाले आणि रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. अनेकांनी आप्तस्वकीय गमावले होते. तपासादरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींवर दहशतवाद प्रतिबंधक कायद्यानुसार (MCOCA) गुन्हे दाखल केले होते. मात्र 2025 मध्ये आलेल्या निकालानुसार पुराव्यांची कमतरता आणि तपासातील त्रुटींमुळे न्यायालयाने सर्व आरोपींना दोषमुक्त केले आहे.
हा निकाल केवळ पीडित कुटुंबीयांसाठी धक्कादायक नाही, तर पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर आणि देशातील दहशतवादविरोधी कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतो आहे. 2006 सालचा हा स्फोटांचा दिवस मुंबईच्या काळ्या इतिहासात कायमचा कोरला गेला, पण 19 वर्षांनंतरही ‘खरे आरोपी कोण?’ हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.


